थोडं इतिहासात डोकावुया:
असं म्हणतात की विंध्याचल पर्वत ओलांडुन दक्षिणेत गोदातीरी वास्तव्य करणारे 'अगस्त्य/अगस्ती' ऋषी हे पहिले आर्य. प्राचीन काळी खान्देशाचे नाव 'रसिक' होते.

त्या काळात सम्राट अशोकाच्या अंमलाखाली हा प्रदेश होता. त्यांच्यानंतर 'संगा' घराण्यातील 'पुष्यमित्र' याने मौर्यांना इथुन दूर करुन राज्य केले. त्याच्याही नंतर सातवाहन राजांनी हा प्रदेश काबिज केला.

इ.स. २५० मधे अभिर/ अहिर राजांनी आक्रमण करुन सातवाहनांना दुर केले आणि इथे अनेक वर्ष राज्य केले. इ.स. ३१६- ३६७ या काळात इथे महाराजा रुद्रदास, महाराजा स्वामीदास, महाराजा भुलुंडा ह्या अहिर राज्यांनी राज्य केले. हे अहिर राजे उत्तर हिंदुस्थानातुन इकडे आले. पशुपालन /शेती हा जरी त्यांचा व्यवसाय होता तरी ते लढवय्ये होते. त्यांची भाषा अहिरवाणी किंवा अहिराणी ही खान्देशातली भाषा आहे. खर तर खान्देश परगण्याला तीन जिल्ह्यांच्या परिसिमा लाभलेल्या आहेत. महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि गुजरात. तिन्ही राज्यांच्या भाषा मिळुन अशी अहिराणी भाषा बनलेली आहे.

काही काळ यादव कुळातील सेउनचंद्र राजाने इथे राज्य केले त्याच्या नावावरुन 'सेउनदेश' असे नाव पडले. नंतर गुजरातेतील फारुकी राजे अहमद१ या खानांच्या नावावरुन 'खान्देश' असे नाव झाले. सातवाहनांनंतर वाकाटक, राष्ट्रकुट, चालुक्य राजांकडुन हा प्रदेश १३व्या शतकापर्यंत देवगिरीच्या यादवांकडे आला. अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणानंतर १२९४ मधे हा प्रदेश त्याच्या ताब्यात गेला होता. १३७० पर्यंत खिलजीने राज्य केले. त्याच काळात थाळनेर आणि करवंदी सुभा सुलतान फिरोज तुघलक याच्याकडुन मलिक राजा फारुकी ला दान देण्यात आला. त्याच्या काळात देवपुर आणि जुने धुळे येथे गढी बांधण्यात आली. दुर्दैवाने १८७२ च्या पांझरेच्या पुरात देवपुरातली गढी वाहुन गेली. धुळ्याजवळच्या लळिंग किल्ल्यावरुन सुलतान फारुकीने इ.स. १६०० पर्यंत धुळ्यावर अंमल गाजवला. इ.स. १६२९ मधे हा प्रदेश मुघलांच्या साम्राज्यात गेला. इ.स. १८०३ मधे पडलेल्या भयंकर दुष्काळामुळे अनेक लोक गाव सोडुन निघुन जाउ लागले तेव्हा, विठ्ठल नरसिंग विंचुरकरांचा सहकारी बाळाजी बळवंत याच्या प्रयत्नाने पुन्हा हे गाव वसले.
१८१८ मधे हा परगणा इंग्रजांच्या ताब्यात गेला. ब्रिटिशांचा सनदी अधिकारी कॅप्टन ब्रिग याने हा विभाग चालवायला घेतला. असं म्हणतात की धुळे शहराची विशिष्ट रचना कॅप्टन ब्रिग यांच्या प्रयत्नातुन साकारली आहे. शहरातुन जाणारा एकच मुख्य रस्ता आणि त्याला काटकोनात जोडणा-या गल्ल्या/ रस्ते ही ती विशेष रचना.

१५ ऑगस्ट १९०० मधे धुळे- चाळीसगाव रेल्वे सुरु झाली. स्वातंत्र्योत्तर काळात १९६० मधे धुळे जिल्हा महाराष्ट्र राज्याला अधिकृतरित्या जोडला गेला.

१ जुलै १९९८ साली धुळे जिल्हा विभागुन 'धुळे' व 'नंदुरबार' असे दोन जिल्हे तयार करण्यात आले.

Wednesday 7 December 2011

चिकोल्या/ वरणफळ

यालाच कोणी चिखल्या म्हणतं तर देशावर वरणफळ म्हणतात. एखाच्या रविवारी स्वयंपाकाचा चिकन इ. मांसाहारी किंवा तेच ते पोळी भाजी खाउन कंटाळा आला असेल हा सगळे जण घरात असतील तेव्हा करायचा मेनू आहे.
 
साहित्यः
वरणासाठी: एक वाटी तूरदाळ
हळद, हिंग, जिरे-मोहरी , कडीपत्ता वै. फोडणीचे जिन्नस
आवडत असल्यास गोडा मसाला
लाल तिखट
मीठ आवडेल तसे
चिंचेचा कोळ आणि गुळ
कोथिंबिर
चिकोल्यांसाठी: गव्हाचे पीठ
तेल
ओवा- १ छोटा चमचा
मीठ, हळद
क्रमवार पाककृती: 
 
कृती:
तुरदाळ हळद, हिंग घालुन वरणाला लागते तशी शिजवुन घ्यावी. नंतर हलकेच घोटुन तिला फोडणी द्यावी. त्यात गोडा मसाला, लाल तिखट, चिंचेचा कोळ/गुळ आणि बरेचसे पाणी घालुन उकळु द्यावी.
एकीकडे, गव्हाचे पीठात ओवा, हळद , हिंग घालुन पु-यांना भिजवतो तशी कणिक घट्टसर भिजवुन घ्यावी. आणि १० मिनिटे कणिक चांगले मुरु द्यावी. त्यानंतर तिचे पोळपाट भरुन पोळीच पण जरा जाडसर लाटावी. त्याचे तिथेच शंकरपाळ्याच्या आकाराचे पण थोडे मोठे असे काप करावे. सुटे करुन उकळत्या वरणात टाकावे.गॅस जोरातच असावा. सगळे टाकुन झाल्यावर व्यवस्थित खाली-वर करुन, झाकण लावावे व गॅस बारीक करावा. १० मि. ठेउन चिकोल्या व्यवस्थित शिजल्या असल्यास, गरमागरमच सर्व्ह कराव्यात. आणि भरपुर तुप घालुन खाव्यात. (गरमागरम चिकोल्यांची चव नंतर थंड झाल्यावर नाही)
टीपः वरील कृती जाड बुडाच्या पातेल्यात करावी. कुकरमधे नाही.
तसेच चिकोल्या जनरली दुपारच्या जेवणालाच करतात. आणी दुपारच्या उरलेल्या चिकोल्या संध्याकाळी/रात्री जरी खाल्ल्या तरी चव देत नाहीत म्हणुन शक्यतो आटोपशीरच कराव्यात.
वाढणी/प्रमाण: 
४ ते ६ जणांसाठी
 
अधिक टिपा: 
गुजराती लोक, या वरणात तुरीच्या ओल्या शेंगा किंवा थोड्या गवारीच्या शेंगा टाकतात. टेम्प्टींग होते.
माहितीचा स्रोत: 
आई

Monday 14 November 2011

लग्नाची गाणी

तुळशीच्या लग्नानंतर पुन्हा लग्नसराई सुरु झाली असेल खान्देशात.
माझ्या लहानपणी, हिंदी सिनेमाच्या गाण्यांवर लग्नाची गाणी जुळवायची खुप क्रेज होती. त्यावेळचेच हे एक गाणे आठवतेय. एकत्र कुटुंब पद्धती, त्यात लग्नाच्या तारखेच्या ८-१० दिवसांपासुन घरात पाव्हण्या-रावळ्यांचा राबता सुरु व्हायचा. करवल्यांना खास आमंत्रण देउन बोलवले जायचे किंवा भाऊ स्वतः घ्यायला जायचे.. दिवसभर गव्हाची रास पाखडणे, निवडणे, हळद फोडणे ही कामे झाली की रात्री चांदण्यांच्या प्रकाशात अंगणात सर्वांनी बसायचे. सगळ्या मुली,वयस्कर बायका बरोबर बसत. अशातच एकेकीला गाण्याचा आग्रह होत असे. एकीने सूर लावला की बाकीच्या तिला साथ द्यायच्या. मग एकमेकींच्या म्हणजे, नणंदांच्या, मामीच्या, वहीनीच्या उखाळ्या पाखाळ्या त्या गाण्यातुन काढायच्या. वहीनी पण हसुन दाद द्यायची त्यावेळेस.  मग एखादी नणंद उठायची .. नाचत नाचत भावजईच्या पुढे चुटक्या वाजवत गाणे म्हणायची," वारभर कपडा माले देशी ते सांगाले व्हतं वं सांगाले व्हतं" असं काहीसं एक गाणं होतं.
वडीलधारी मंडळी झोपाळ्यावर बसुन गंमत बघायची. तर नवरा मुलगा...मुद्दाम तिथे चक्कर मारत असे. मग कानावर पडलेल्या ओळींनी स्वतःशीच हसत असत. (इथे नवरी मुलगी असेल तर लाजेने चुर्र होई. मग कधी कधी गाण्यात्,'तुले सासरे जानं पडी... वै." सांगत ...तेव्हा नवरी, नवरीच्या आईच्या डोळ्यात पाणी येइ. )

ओ फिरकीवाली, तु कल फिर आना
नही फिर जाना, तु अपनी मकानसे
बने की शादी है बडी धुमधामसे

चैन तुम तो पेहनो बनाजी
पेहननेवाले है नाराज खुशी
बना के मन में ठुशी
तु अपनी मकान से....
बने की शादी है बडी..

घडियाल तुम तो ओ पहनो बनाजी
पेहननेवाले है नाराज खुशी
बना के मन मे ठुशी
तु अपनी मकान से...
बने की शादी है बडी धुमधाम से

Thursday 29 September 2011

कानबाई- खान्देशातील एक प्रथा!




 श्रावणातल्या नागपंचमीनंतरच्या पहिल्या रविवारी कानबाई किंवा कानुबाई हा उत्सव खान्देशात उत्साहाने साजरा होतो. त्यासाठी तिथी वगैरे बघत नाही. कानबाई उत्सवाला फार जुनी परंपरा लाभली आहे. कुणी म्हणतं पुर्वी खानाचं राज्य होतं. त्याला तु'झ्या नावाची म्हणजे "खानबाई' साजरी करतो असं सांगुन हा हिंदुंचा सण साजरा करत होते. कुणी म्हणतं , हा खान्देश = कान्हादेश! खान्देशी लोक कान्हा म्हणजे श्रीकृष्णाला मानतात म्हणुन त्यांनी देवीचा उत्सव सुरु करण्यासाठी 'कानबाई' हे नाव घेतलं असावं. हा उत्सव प्रामुख्याने सोनार, शिंपी, चौधरी, माळी या समाजात साजरा होतो.

या उत्सवाच्या आधीही दिवाळ सणाच्या आधी करतो तशी घराला रंगरंगोटी होते. घरातील भांडी घासुन पुसुन स्वच्छ केली जातात. पडदे, चादरी, बेडशीट्स, कव्हर्स सगळे धुवुन घेतात. एकत्र कुटुंब असेल तर रोटांसाठी घरातील लहान मोठ्या पुरुषांना मोजुन प्रत्येकाची सव्वा मुठ असे धान्य म्हणजे गहु,चण्याची दाळ घेतले जाते. तेही चक्कीवालीला आधी सांगुन ( तो मग चक्की धुवुन पुसुन ठेवतो.) चक्कीवरुन दळुन आणले जाते. विशेष म्हणजे या दिवशी चण्याच्या दाळीचाच स्वैपाकात जास्त वापर असतो. पुरण पोळी, खीर कटाची आमटी चण्याची दाळ घालुन, गंगाफळ/ लाल भोपळ्याची भाजी असा थाट असतो. कांदा लसूण वर्ज्य. गौरीला करतात तसं डेकोरेशन केले जाते. कानबाईचे नारळ मुख्यतः पुर्वापार चालत आलेले असते. कानबाईचे नारळ परनुन आणलेले असते. 

'कानबाई परनुन आणणे'-  पुर्वीच्या काळी एखाद्या खेड्यात ठरवुन गावचे पाटील लोक गावोगावी आमंत्रण पाठवायचे. ज्या घरातल्या बाईला काही कापलेलं, भाजलेलं नाही...अंगावर एकही डाग नाही अशा सवाष्णी निवडल्या जायच्या. सासरी असल्यातरी सासरकडचे लोक घेउन यायचे. तेव्हा गावात उत्सव व्हायचा. त्या स्रीयांना नाना वस्त्र अलंकारांनी सजवुन त्यांची पुजा करायचे. गावची गावं जेवायला असायची. टनाने पुरणपोळ्या रांधल्या जायच्या. अक्षरशः बैलगाड्यांवर धोतरं अंथरुन शिजवलेला भात लादला जायचा. हा सगळा स्वैपाक ..नदीवरुन पाणी आणण्यापासुन पुरुषमंडळी करायची. तिथे त्या सवाष्णींनी स्पर्श केलेला नारळ घेउन तोच वर्षानुवर्षे पुजेत वापरला जातो. आता चाळीसगावजवळ उमरखेडला म्हणे कानबाईचं मंदीर बांधलय. ज्यांना नविनच कानबाई बसवायची असेल तर ते नारळ घेउन तिथल्या मूर्तीला स्पर्श करुन आणतात.

तर असे हे परनुन आणलेले नारळ त्या दिवशी धुवुन घेतात त्यालाच नथ, डोळे, वै. बसवुन इतरही पारंपारीक दागिने घालतात. आणि केळीचे खांब बांधलेल्या चौरंगावर तांब्याचा कलश ठेउन तिची स्थापना होते. कलशावरुनच गळ्यातले हार, मणी मंगळसुत्र वै. चढवले जाते. वरुन शेवंतीची वेणी लावुन ओढणी लावली जाते. मग आरती, नैवेद्य दाखवतात. नैवेद्याला अर्थातच पुरणपोळ्या, पुरणाचेच दिवे, देवीचा सगळा साज म्हणजे भंडारा, वेणी, फणी, आरसा, बांगड्या, टिकली, पोळपाट लाटणे, तवा हे सगळं कणकेचच केलं जातं ( ही कणीक पण स्पेशली पीठात साजुक तुप घालुन दुधात मळलेली असते) हे सर्व काशाच्या ताटात ठेउन देवीला ओवाळतात. इतर सणासारखाच इथे ही ज्येष्ठांना मान असतो. रात्री जागरण केले जाते. फुगड्या, गाणी म्हटली जातात. काही जणांकडे फक्त रोट असतात. मग ते रोट परातीत घेउन कानबाईच्या दर्शनाला येतात. या दिवशी कुणी कानबाईला काही मानता/ नवस केला असेल तर तो फेडण्यासाठीही गर्दी होते. मुख्यतः नारळाच्या तोरणाचा नवस असतो. आपल्या घरी दर्शनाला येणार्या प्रत्येक भक्ताला लाह्या फुटाण्यांचा प्रसाद दिला जातो.
काहींकडे हातापायाची कानबाई असते तरकाहींकडे कानबाई- रानबाई अशा दोघी बहिणी दोन वेगवेगळ्या चौरंगावर बसवतात.

दुसर्या सकाळी लवकर उठुन कानबाईच्या विसर्जनाची तयारी होते. कानबाईची आरती करुन अंगणात चौरंग नेऊन ठेवतात. गल्लीतल्या सगळ्या कानबाया एकाच वेळेस निघतात. ढोल ताशांच्या गजरात कानबाईचा चौरंग डोक्यावर ठेउन बायका नदीवर निघतात. कानबाईचा नि त्या स्त्रीचा नमस्कार करण्यासाठी ही झुंबड उडते. कानबाईपुढे मुले, मुली फुगड्या खेळतात. वाजत गाजत जातांना समोरुन दुसरी कानबाई आली तर दोन्ही कानबायांची चौरंग (डोक्यावर धरलेल्या स्थितीतच) जोडुन भेट घडवली जाते. अशातच एखाद्या कानबाई धरलेल्या स्त्रीच्या अंगात आले तर ती त्याही स्थितीत नाचते पण डोक्यावरचा कलश नि कानबाई अजिबात सरकत नाही.
नदीवर एकदा आरती होउन कानबाईच्या नारळाव्यतिरिक्त सगळ्याचे विसर्जन होते. नदीतलीच वाळु घेउन त्यावर कलश नि आपापले कानबाईचे नारळ तसेच डोक्यावर घेउन पुन्हा वाद्यांच्या गजरात घरी परततात. पुरणाचे दिवे मग मोडुन त्यांचा बारीक चुरमा केला जातो. दही, दुध, तुप घालुन ह्या चुरम्याची चव अप्रतिम असते. मग हा चुरमा नि पुरणपोळ्या वै. देवीला आदल्या दिवशी दाखवलेला नैवेद्य हे सगळं काशाच्या त्या एका ताटातच देवीचा प्रसाद म्हणुन फक्त घरातलेच लोक खातात. अगदी लग्न झालेल्या मुलीला सुद्धा हा प्रसाद वर्ज्य असतो.

दुसर्‍या दिवशी नि तिसर्‍या दिवशी पण रोटांचंच जेवण असतं. रोट ( म्हणजे सवा सवा मुठ गहु घेउन दळुन आणलेलं पीठ) संपेपर्यंत ते खावच लागतं.रोट संपेपर्यंत जेउन हात धुतलेलं पाणी नि उष्ट्या ताटातील पाणीसुद्धा खड्डा करुन त्यात ओततात. काहीही उष्ट गटारीत किंवा इकडे तिकडे पडु देत नाहीत. पौर्णीमेच्या आत रोट संपवावे लागतात. जर मधेच पौर्णिमा आली तर त्याआधीच उरलेलं पीठं खड्डा करुन पुरुन टाकतात.
कानबाईमुळे घरातली, गावातली इडा पिडा टळते असा लोकांचा विश्वास आहे.

परवाच कानबाईचे एक गाणे ऐकले. ते जसेच्या तसे इथे देत आहे.

डोंगरले पडी गई वाट,
वाट मन्ही कानबाईले|

कसाना लउ मी थाट
थाट मन्ही कानबाईले
साडी चोळीना लउ मी थाट
थाट मन्ही कानबाईले
डोंगरले पडी गई ....

कसाना लउ मी थाट
थाट मन्ही कानबाईले
पुजा पत्रीना लउ मी थाट
थाट मन्ही कानबाईले
डोंगरले पडी गई...

कसाना लउ मी थाट
थाट मन्ही कानबाईले
फुलेस्ना लउ मी थाट
थाट मन्ही कानबाईले
डोंगरले पडी गई ...

कसाना लउ मी थाट
थाट मन्ही कानबाईले
रोटास्ना लउ मी थाट
थाट मन्ही कानबाईले
डोंगरले पडी गई...

कसाना लऊ मी थाट
थाट मन्ही कानबाईले
तोरणना लउ मी थाट
थाट मन्ही कानबाईले
डोंगरले पडी गई....

Friday 29 July 2011

डोंगर हिरवा गार, माय तुना डोंगर हिरवा गार!

सध्या खान्देशात लग्नसराईत वाजत असलेलं गाणं! :)

डोंगर हिरवा गार, माय तुना डोंगर हिरवा गार!
डोंगर हिरवा गार, माय तुना डोंगर हिरवा गार !!

चम चम चमके नांदुरी बझार
डोंगर हिरवा गार...
कपाळी कुंकु डोयामा काजळ
मांगमा भरा गुलाल,
माय तुना डोंगर हिरवा गार!

डोंगर हिरवा गार, माय तुना डोंगर हिरवा गार!
जतरा भरनी चैत्र मजार,डोंगर हिरवा गार!

कानमा कुंडल, नाकमा नथनी,
गया मा बांधा तार, माय तुना डोंगर हिरवा गार!
माय तुना हाथमा सोनानी, तलवार डोंगर हिरवा गार!

डोंगर हिरवा गार, माय तुना डोंगर हिरवा गार!
डोंगर हिरवा गार, माय तुना डोंगर हिरवा गार !!

Monday 20 June 2011

आखाजीचे गाणे

खान्देशात आखाजीला मुलींना गौराई म्हणुन माहेरी आणले जाते.
गल्लीच्या मधोमध मोठ्ठाले झोके बांधुन मुली हे गाणं म्हणतात.

आथानी कैरी तथानी कैरी कैरी झोका खाय वं
कैरी तुटनी खडक फ़ुटना झुयझुय पानी व्हायं वं ||
झुयझुय पानी व्हाय तठे कसाना बाजार वं
झुयझुय पानी व्हाय तठे बांगड्यास्ना बाजार वं ||
माय माले बांगड्या ली ठेवजो ली ठेवजो
बन्धुना हातमा दी ठेवजो ली ठेवजो ||
बन्धु मना सोन्याना सोन्याना पलंग पाडू मोत्याना

आथानी कैरी तथानी कैरी कैरी झोका खाय वं
कैरी तुटनी खडक फ़ुटना झुयझुय पानी व्हायं वं ||

Saturday 14 May 2011

खान्देशी लग्न पद्धती आणि चाली रिती, लग्नातली गाणी इ.

पुर्वी सांगितल्याप्रमाणे, खान्देश हा महाराष्ट्राच्या उत्तर सिमेवरचा परगणा. याला एका बाजुला गुजरात राज्याची सीमा तर दुसरीकडे मध्यप्रदेशची सीमा आहे त्यामुळे एकूणच खान्देशी जीवनशैलीवर या तीन्ही राज्यांचा मिश्र प्रभाव दिसतो. खान्देशी भाषा ही मराठी + हिन्दी + गुजराती अशी बनलेली आहे. जवळच सातपुडा डोंगररांगात भिल्ल ही आदिवासी जमात आहे.खान्देशी नृत्यात त्यांचीही थोडी शैली दिसुन येते. तसेच महाराष्ट्र-म.प्र. सीमेवरील बु-हाणपुर हे गाव आधी गुजरातचा राजा अहमद याची राजधानी होते. त्यामुळे थोडा मुसलमानी पगडा दिसतो.
तिथली विवाह पद्धती, चाली रिती सर्वांना माहित व्हावी एवढीच अपेक्षा. मी माझ्या (बाल) बुद्धीप्रमाणे अर्थ लावलाय तो गोड मानुन घ्यावा.
टीपः खान्देशी किंवा अहिराणी भाषेत 'शे' (म्हणजे आहे) हा शब्द म्हणजे गुजरातीतल्या 'छे' चा अपभ्रंश आहे. तसच 'ळ' शब्द उच्चारता येत नसावा म्हणुन सगळीकडेच "ळ' च्या ऐवजी 'य' वापरलेला दिसतो.
खान्देशी लग्नात लगिनघाई लग्नतारखेच्या आठ दिवस आधीपासुन सुरु होते. सुरुवातीला पितरांना मान दिला जातो. ज्या घरी लग्न आहे तिथे आधी पितर व सवाष्ण जेऊ घातले जातात नंतर देवाचे कार्यक्रम सुरु होतात त्यात पाच सवाष्णींनी मिळुन गव्हाची रास पुजणे नंतर पाच सवाष्णींच्या हस्ते हळद फोडणे, खंडोबाचे अष्टीवर जेऊ घालणे, सोनाराकडे दिलेले देव आणण्यास वाजत गाजत जाणे(हे बहुधा वराची / वधुची बहिणे मेव्हणे जातात), कुलदेवतेचा कुळाचार म्हणजे कुळधर्माच्या आरत्या इ., देवांना आमंत्रण, तेलन पाडणे, लग्नाच्या हे विधी अगदी लग्नाच्या आदल्या दिवसापर्यंत होतात.
या प्रत्येक विधीच्या वेळेस बायका गाणी म्हणतात. एक वयस्क बाई आधी एक ओळ म्हणते, तिच्या मागुन सगळ्या बायका कोरस धरतात. खाली मी एकेक गाणं आणि त्यांचा जरुर तिथे अर्थही देत आहे.
हळद फोडायच्या वेळेस म्हणावयाचे गाणे:
सप सोनं ओ सपननी आरती
म्हारा सपनामां आया कुंकूना जोड
बानू आया ओ लाडाले कुंकू चढे
सप सोनं ओ सपननी आरती ||१||
म्हारा सपनामां आया हळदीना जोड
बानू आया ओ लाडाले हळदी चढे
सप सोनं ओ सपननी आरती ||२||
म्हारा सपनामां आया चोखाना जोड
बानू आया ओ लाडाले चोखा चढे
सप सोनं ओ सपननी आरती ||३||
म्हारा सपनामां आया बाशिंगना जोड
बानू आया ओ लाडाले बाशिंग चढे
सप सोनं ओ सपननी आरती ||४||
म्हारा सपनामां आया कांकणना जोड
बानू आया ओ लाडाले कांकण चढे
सप सोनं ओ सपननी आरती ||५||
हळदी, कुंकू, तांदुळ, बाशिंग, कांकण या ५ वस्तुंना विवाह विधींमधे फार महत्व आहे.
चोखा: गुजरातीत तांदुळ.
कांकणः घोंगडीच्या छोट्या चौकोनी तुकड्यात हळकुंड, सुपारी आणि लोखंडी खिळा बांधुन तो हळदीने पिवळ्या केलेल्या दो-याने शिवुन वधु/वरांच्या उजव्या हातात बांधतात. हळद लावल्यावर 'बाहेरची बाधा' चटकन होते, त्यावर तोडगा म्हणुन हे बांधतात.


हळद लावायच्या वेळेस म्हणावयाचे गाणे
गंगा जमुना दोन्ही खेटे
तठे काय रोपे देवपह्याले
तठे काय कापूसना बेटे,
तठे काय परभू उखले ताना
विस्नु किस्नु कांड्या भरे,
राय रुक्मिनी पोयतं करे
तठे काय सिताबाई काटे,
तठनं पोयतं कोनले आनं
तठनं पोयतं (वधु/वराचे नाव) ले आनं
(वधु/वराच्या बाबांचे नाव) ना बाप गोडे उना
बाशिंग मोती जडे उना, वाजा गये रथ उना
मोती पये रथ उना
हेच गाणं नंतर 'बाप' या जागी मामा, भाऊ, काका, मावसा हे टाकुन म्हटलं जातं.
(खान्देशात कापुस फार पिकतो. कल्पना केलीय की गंगा जमुना या पवित्र नद्यांच्या खोर्‍यात आलेल्या देवपह्य म्हणजे देवकपाशीच्या झाडापासुन विष्णु कृष्ण या देवांनी कापुस काढला जिचं राही रुक्मीणीने पोयतं केलं आणि ते सीतामाईने वधुसाठी आणलं. तर वर/ वधुचा बाप/ मामा/ भाऊ/ काका/ मावसा हे घोड्यावरुन ते घेण्यास गेले. आणि त्याला बाशिंग मोती जडलेले होते. बरोबर वाजा म्हणजे बॅन्डबाजा घेउन गेले आणि तिकडुन मोती पये (पोवळे) भरलेला रथ घेउन आले.)
शब्दार्थःपोयतं: हळद लावलेलं पाच पदरी कच्चं सूत वर/वधुच्या गळ्यात घालतात त्याला पोयतं म्हणतात. वर/वधुला भोवती रांगोळी काढलेल्या पाटावर बसवतात. पाटाच्या चारही कोपर्‍यात तांब्याचे/पितळाचे तांबे ठेवलेले असतात. या चारही तांब्यांच्या भोवतालुन पाच पदरी कच्चं सूत गुंडाळले जाते नंतर हे गाणे म्हणत ते सूत काढुन घेतात. त्याला पाच सवाष्णी भोवती धरुन पाण्यात कालवलेली हळद लावतात. मग ते सूत वधु/वरांच्या गळ्याप्रमाणे अ‍ॅडजस्ट करुन वधु/ वराला घातले जाते.
तठे: तिथे, तठनं: तिथलं
कोनले: कोणाला
उना: आला
आनं: आणलं
देवपह्यः देवकपाशी- ह्या झाडापासुन वर्षभर कधीही कापुस मिळतो.
पये: पवळे

तेलन पाडणे म्हणजे एका वाटीत थोडं गोडेतेल घेउन त्यात देवकपाशीची किंवा आंब्याच्या झाडाच्या काडीला कच्च सूत ५ वेळेस गुंडाळुन ती वाटीत उभी करतात. मग ५ सवाष्णी ती वाटी घरातल्या एकेक देवांवर धरुन खालील गाणे म्हणतात.

तेलन पाडायच्या वेळेस म्हणावयाचे गाणे

समदीर सुकतं पानी मुकतं हळद कुंकू कालव जा
गणपतीवर तेलन पडे सरस्वतीले बलाव जा ||१||
समदीर सुकतं पानी मुकतं हळद कुंकू कालव जा
खंडेराववर तेलन पडे म्हाळसाले बलाव जा ||२||
समदीर सुकतं पानी मुकतं हळद कुंकू कालव जा
कानबाईवर तेलन पडे रानबाईले बलाव जा ||३||
समदीर सुकतं पानी मुकतं हळद कुंकू कालव जा
कुळमातावर तेलन पडे भवानीले बलाव जा ||४||
समदीर सुकतं पानी मुकतं हळद कुंकू कालव जा
शब्दार्थः
कालव जा : कालवुन घ्या.

आता हीच वाटी चुलीवर धरायची आणि खालील गाणे म्हणायचे.
चुल्हा म्हणे मी चुल्हा देव, लाया चंदन कपाय्या
आन शिजे सव्वा खंडी, या आननी किर्ती मोठी
लोक जेवती लखोपती ||१||
शब्दार्थः
कप्पाया: कपाळाला
आनः अन्न

त्यानंतर सवाष्णी ही वाटी विहीरीवर धरतात. वे हे कडवे गायले जाते.

कांजील म्हणे मी कांजीलपाणी,कांजील कशीयाना राशी
कांजील द्राक्षाना राशी, कांजील वंगळवाणी दिसे
कांजीलले बहुत गोडाई, कांजील पंगती वाढाई
कांजील म्हणे मी कांजीलपाणी, कांजील कशीयाना
राशी कांजील निंबाणीच्या राशी कांजील वंगळवाणी
दिसे कांजीलले बहुत गोडाई, कांजील पंगती वाढाई
कांजील: विहीर
त्यानंतर ही वाटी ताक घुसळायच्या मडक्यावर किंवा उखळावर धरायची.

दारन म्हणे मी दारनदेव, दारन घुसळे ओ कोन
दारन घुसळे ओ सिता, इनी सोनानी रांजनी
इना नागमोडी रई, तुटा तुटा रई दोर, लावा लावा मोत्या सर
इना तांबा ना ओ लोटा, इनी धरमजा वारा
इनी: हिची
सोनानी: सोन्याची
रांजनी: रांजणी
रई: रवी

आता ही वाटी उंबरठ्यावर धरायची.

तु उठरे कबाडी खांदी घेतल्या कुर्‍हाडी
डोई घेतल्या भाकरी, गेला डोंगर पखाडी
साग तोडजो निबाडी ,उंबरट गाड्यात घातीला
उंबरट शेल्याने झाकीला टाका सुतारच्या दारी,
उंबरट सुतार घडीया, उंबरट लव्हार जडीया
उंबरट मिनार मढीया, उंबरट वापरे ओ कोन
उंबरट वापरे ओ सिता,
हाती इना रत्ने चुडा, मुखी इना पाननां ईडा
माथी इना भंवर जुडा, हाती चंदननी वाटी
सूर्या शिपडत जाय, बाळ खेळाडत जाय
अर्थः उठ रे कबाडी, कबाडी उठला, कु-हाड घेउन डोंगरावर गेला आणि असली सागाच्या झाडाचे निबर लाकुड उंबरठ्यासाठी तोडुन आणले. हा उंबरट बैलगाडीत घातला, शेल्याने झाकुन सुताराकडे टाकला, सुताराने घडवला, लोहाराने जडवला, त्याला मिनाकारी केली आणि हा असा उंबरठ वापरतय कोण तर सिता माई जिच्या हातात रत्नजडीत चुडा, मुखी पानाचा इडा आहे. जिच्या डोक्यावर भंवर जुडा आहे आणि ती हातात चंदनाची वाटी घेउन उंबरठ्यावर शिंपडतेय. मधेमधे बाळ लुडबुडतोय.
पुन्हा ती वाटी घराजवळच्या उकीरड्यावर नेतात. किंवा घरातलाच कचरा गोळा करुन त्यावर धरतात.

उकीरडा म्हणे मी उकीरडा देव, उखल्ले पुंजा कोन टाके
उखल्लाचे पूजा सिता टाके, हाती सोनाना खरोटा
झाडी उनी गाय गोठा, इनी रुपानी डालकी
इनी मोत्यानी चुमय, इना उकरडा क्यावं मोठा
उखल्ला: उकीरडा
अर्थः उकीरडा म्हणतोय मी उकीरडा देव. कारण यावर पुंजा म्हणजे कचरा कोण टाकतेय तर साक्षात सितामाई. ती सोन्याच्या खराट्याने गायीचा गोठा झाडुन आलीय आणि तिची रुप्याची डालकी म्हणजे टोपली, व मोत्याची चुमय(चुंभळ) आहे.


आता ही वाटी दिव्यावर म्हणजे समईवर धरतात. आणि पुढील कडवे म्हणतात.

दिवा म्हणे मी दिवलाया, दिवा निवाजना कोठे
गावत्या आनंदाना पेटे, अरे तू शिलावर भावू
सांग तुनं दिवलायानं मोल, सव्वा लाई वर लाख
देऊ दिवा सोबनले लऊ, दिवाले नवु मणनी वात
दिवाले आनंदानं तेल, दिवा जळे मांडवात
या वर्‍हाडी वापरती, कलाबूत झळकती

असं फिरत फिरत सर्वात शेवटी ही वाटी नवरदेववर/ नवरीवर धरतात. शेवटचे कडवे:

हाई काय सुतारनं पाट वर काय परभूतानी घडी
वर मोतीनं चौक भरी, हाई काय कसारनी वाटी
हाई काय नागिननं पान, हाई काय सरावन कांड
याले काय कच्चे सुतं गुंड, हाई काय तेलनीनं तेल
अरे तु नंदूराया तेली, तुन्ही चिंचोलानी लाट
तुना अंबियाना घाना, हाउ काय सोताना डबना
तेल इकस मोहना ह्या काय तेलन्या पाची धारा
नवरदेव ...वरी धरा
एक फूल तोड ओ सवासणी, द्या त्या नवरदेवना कानी
अर्थः हे काय सुताराकडुन घडवलेलं पाट, त्यावर कोर्‍या कपड्याची घडी, वर मोत्याने चौक भरलेला. ही काय आहे अतर कासाराकडची वाटी, त्यात विड्याचं पान, त्याच्या वर एका काडीला गुंडाळलेलं कच्चे सूत, वाटीत तेलीणकडचं तेल. अरे नंदुराया तेली, हा तुझ्याकडचा तेलाचा डबा, तुझ्या लाकडी घाण्यावर काढलेलं तेल, त्याच्या पाच धारा नवरदेवभाऊच्या डोक्यावर धरा गं सवाष्णींनो!!

देवांना आमंत्रण देणे: एका ताटात ५ कणकेचे दिवे ठेवुन त्यांच्या मध्यभागी कुलदेवतेचा टाक आणि आजुबाजुला तेलन पापड्या म्हणजे मैद्यात फक्त हळद कालवुन पापडांसारख्या लाटलेल्या (मीठ टाकत नाही) व तेलात तळलेल्या पापड्या. असं ताट देवाला ओवाळतांना पुढील गाणे म्हणतात.
बाकीचे हातात हळदी कुंकुने माखलेले तांदुळ घेउन देवांना आमंत्रण देतात.

कच्चा सुतना बाजूला, टाका देवना दरबारी
कोना घरीन सोबत, नवरदेवघरीन सोबन
आमना निवते र्‍हायजा, तप्ती आंघोळ करजा
चंदन टिलक लावजा, बहिण भाचीले मुळ जायजा
रंगीत वहील्या जुपजा, तुमन्या रावन्या पावन्या
बैलं तुमनं जुंगून पुर्‍हान राम सोडी देरे गाई
लक्ष्मण दूध लेरे धोई, सिता दूध ले ओ ताई
दूध तपे गर्मे गर्मे, या दूधनी पिवळी साय
वास स्वर्गे जाय, स्वर्गे लोक काय म्हणती
मीर्गी लोकात काय काम होती,
आपला वशीला नांदती, कन्या पुत्र उजती
अर्थः कच्च्या सुताच्या बाजुला देवांचा दरबारी म्हणजे
आपली कुलदेवता देवांना वशिला लावते.
निवतं म्हणजे आमंत्रण. आमचं आमंत्रण घ्या, तप्त पाण्याने आंघोळ करुन घ्या, चंदनाचा तिलक लावा, बहिणी भाच्यांना मूळ घ्यायला पाठवा. रंगित बैलगाड्यांनी तुमचे पाव्हणे रावळे सर्वांना घेउन या. रामा गाई सोडुन दे रे आणि लक्ष्मणा गाई धु म्हणजे दूध काढ, सितामाई दुध तापव, गरम दुधाची पिवळी साय, त्याचा वास स्वर्गात गेला तर स्वर्गातले लोक काय म्हणतात," मृत्युलोकात काय काय कार्ये होतात..तिथले लोक आपल्या वशिल्याने कन्या/पुत्र उजवतात. "!


लग्नानंतर वधु वरांच्या आंघोळीच्या वेळी- दामेंडा
नवरदेवावरः
सोनानी कुदाई रुपाना दांडा, खनानी खनानी धुळानी खाण
धुळानी सोननी खाई माटी, ती माटी तम्हाने भरा
तम्हाने भरानी रुमाले झाका, वाजत गाजत कुंभार घरी
कुंभार भाऊनी दामेंडा घडी, दामेंडा घडीला चरीना दरी
माया व बहीणी तुमी र्‍हांदाले निंघा, आनानी उनानी गंगेनं पानी
कणीक भिजिल्या डाबन्यावानी, लोकाज भरील्या लिंबुना फोडी
पूरन र्‍हांदील्या खापर भरी, घड्या घालील्या कोपरभरी, खीरज र्‍हांदीली कापुर डेरा
भातज र्‍हांदीला मोगरान्या कळ्या, शेवाळ्या इळील्या आस
मनना तारा, लाडुज बांधीला रामना चेंडु, भज्याज तळील्या मखमली गेंद
कुरडई तळीली सूर्यानी कळी, पापड तळीला पुनमना चाँद,
जेवाडा जेवाडा नवरानं गोत, नवरानी गोतनी भूकमोड झायी,
कंबरपट्टाना कुस्मरा व्हई, बाहेर निघं वं नवरीनी माय
देखीले देखीले जवाई मुख, जवाई शे तुना हिरा माणिक
लेकज शे तुन्ही रत्नानी टाक
हा एक गंमतीशीर खेळ आहे. लग्न लावल्यानंतर वधु सासरी येते. तेव्हा हळद फेडण्याचा कार्यक्रम होतो. हळद लावल्यानंतर तिन दिवसाच्या आत फेडलीच पाहिजे असं म्हणतात, कारण हळदीच्या अंगाला बाहेरच्या बाधेचा धोका असतो.
शब्दार्थः दामेंडा: कुंभाराकडील मातीचं एक पात्र, र्‍हांदणे: स्वयंपाक करणे, जेवाडा: जेववा किंवा जेवायला वाढा.
अर्थः सोन्याची कुदळी, रुप्याचा दांडा, धुळ्याची खाण खणावी, धुळ्याच्या खाणीतले सोन्याची माती ताम्हणात भरा. ताम्हण रुमालाने झाकुन वाजत गाजत कुंभाराच्या घरी पाठवा. कुंभार भाउने दामेंडा घडवला. आया बहिणी आता तुम्ही रांधायला निघा. गंगेच्या पाण्याने कणिक भिजवली. खापरावरच्या कोपर भरभरुन पुरणाच्या पोळ्या (मांडे) केले. खीर रांधली, मोगर्‍याच्या कळ्यासारखा भात शिजवला. शेवया वेळुन घेतल्या (उकळत्या पाण्यात टाकुन काढणे), रामाच्या चेंडुसारखे लाडु बांधले. मखमली गेंदासारख्या दिसणार्‍या भज्या तळल्या, सूर्याच्या कळीसारखी कुरडया तळल्या. पौर्णिमेच्या चंद्रासारखा पापड तळला. नवरदेवचं गोत आता जेवायला बसवा. त्या लोकांची आता भूकमोड झालीये, कंबरपट्ट्याचा कुस्मरा म्हणजे कुसमरा झालाय. नवरीची आई आता तु बाहेर ये, जावयाचं मुख बघ, जावई तुझा हिरा माणिक आहे तर तुझी लेक रत्नासारखी आहे.


नवरीवरः
नवरानवरी गं कशा न्हाती, तेल पानी गं बने जाती
बनाच्या पान्याला मोर पीती, तिथुन मोर गं उधळीला
आंब्या चाफ्यावर बसविला, आंब्याचाफ्याची हिरवी काडी
नवरी मागते हिरवी साडी
नवरीला नवरा बलावितो, नवरीला कशाला बलावितो
नवरीला न्हायाला बलावितो, मखमलीचा विडा देतो
उठ गं नवरी भाग्यवंत दारी आला गं तुझा खंत

खेळः
नवरा नवरी लक्ष्मण बाय नवरी गयी मामाना आय
मामाजी मामाजी आंदन काय?
दिसु वं भाच्याबाई कपीली गाय, कपिला गायवर धांड्यानी जोडी
धांड्यानी जोडीवर रंगीत गाडी,
पलंग पेडीनी गादीनी दुपटा
गादीनी दुपटानी समया चारी, इथलं आंदन दैवानी नारी
इथलं लेशीनी परघर जाशी, आय बाना जिवले झाया लावशी
सासरा म्हणे सून माले मागनी झायी
अर्थः नवरी गेली मामाकडे, मामाला म्हणते," मामा, मला लग्नात आंदण काय देतोस?", मामा म्हणतोय देतो गं भाचीबाई, कपिला गाय देतो, कपिला गायीवर दोन वासरं/ बैलं देतो. बैलांवर रंगित गाडी, गाडीत पलंग, गादी, समया हे सगळं आंदण देतो. इथलं आंदण घेउन तु परक्या घरी जाशील. आई बापाच्या जीवाला घोर लावशील.

Sunday 8 May 2011

खान्देशी पुडाच्या पाटोड्या





लागणारा वेळ: 
२ तास
लागणारे जिन्नस: 
पुडाच्या पाटोड्या हा एक अस्सल खान्देशी पदार्थ. आखाजी (अक्षय्य तृतीयेला) माहेरी आलेल्या मुलींना घेण्यासाठी आलेले आमरस पुरणपोळीसारखं गोड पदार्थ खाउन कंटाळलेले जावईबापुंनी घरात ऑर्डर द्यावी व सासुबाईला म्हणावे, "मामी, आज तुमच्या हातच्या पुडाच्या पाटोड्या होऊन जाउ द्या!" आणि सासुबाईनी सकाळपासुन खपुन बनवलेला पदार्थ आग्रह करकरुन जावयाला वाढावं, तर यावर जावयाने "तुमच्या हाताची सर कधी आमच्या 'हिच्या' हाताला येतच नाही"!असं बोटं चाटत खात म्हणावं, असा हा पदार्थ आहे. सासुबाईं जावयासाठी पदार्थ बनवतांना जरा सढळ हातानेच सामग्री वापरतात.

तसं या पदार्थाला 'सात पुडी पाटोड्या/ पाटवड्या', 'बाफेल वडी' अशीही नावं आहेत. तसच याला तसा कुटाणा ही फार आहे. पण नंतर एकामागोमाग एक तोंडात टाकताच विरघळणारी मसालेदार पाटोडी खाण्यापुढे हा कुटाणा 'चलता है"!
सामग्री:
पाटोड्यांसाठी:बेसनः ५ मध्यम आकाराच्या वाट्या भरुन
गव्हाचं पीठः एक मूठभर
आत लावायच्या मसाला:कांदा
लसुण
सुकं खोबरं
आले
चटणी
हळद
गरम मसाला
तेजपान
दालचिनी
दगडफुल
बाजा/चक्रफुल
लवंग
मिरी
हे सगळं एकत्र वाटुन घ्यावे. आणि थोड्या तेलावर परतावे अगदी मसाल्याला तेल सुटेपर्यंत. आणि नंतर त्यात मीठ कालवुन कटो-यात काढावे.

कांद्याची करपी:
अर्धा किलो कांदा बारीक चिरुन
लसुणः एक मध्यम आकाराची वाटी लसुण सोलुन
कढईत तेल टाकुन त्यात हा कांदा निट नरम होईस्तोवर परतावा. त्यात हळद आणि चवीपुरते मीठ घालावे.
हीच कृती लसणाच्या करपीसाठी करावी.
आता ही कांदा-लसणाची करपी एकत्र करुन एका कटो-यात काढुन ठेवावी.

सुके खोबरे: एक खोब-याची वाटी सुके खोबरे किसुन आणि अगदी थोडे तेल तव्यावर टाकुन त्यात हे नावाला भाजुन घ्यावे.
कोथिंबिरः बारीक चिरुन एक वाटी
खसखस : वरुन पेरण्यासाठी
क्रमवार पाककृती: 
पाटोड्यांची कृती:सुरवातीला पाण्याला फोडणी देणे म्हणजे थोड्या तेलात हळद टाकुन लगेच ३-४ कप पाणी ओतणे, पाण्यात हिंग, ओवा, चवीपुरते मीठ घालावे. पाण्याला उकळी फुटली की बेसन+ गव्हाचे पीठ हे मिश्रण हळुहळु त्यात ओतत जावे, पीठाची गुठळी होऊ न देता ते लाटण्याने घेरत जावे. व्यवस्थित घेरले/हाटले गेले की थोडे शिजायला ठेवावे. नंतर त्या पीठाच्या गोळ्यावर ओला कपडा झाकुन ठेवावे.
आता एक स्टीलचे ताट पालथे मारुन त्यावर प्लॅस्टीकची बॅग एका बाजुने कापुन घ्यावी त्यात हा गोळा घालुन हाताने मळावे आणि गाठी (असतील तर) व्यवस्थीत हाताने मळुन एकजीव करुन घ्यावे. (प्लॅस्टीकची बॅग- हाताला चिटकु नये आणि पीठ गरम असल्याने) आणि तसेच त्यावरुन लाटणे फिरवुन मोठ्या पोळीसारखे लाटुन घ्यावे. आता वरचा प्लॅस्टीकचा कागद काढुन घ्यावा.
या आख्ख्या पोळीवर सुरवातीला जो वाटलेला मसाला आहे त्याचा एक लेयर द्यावा. नंतर त्यावरुन कांदा लसुण च्या करपीचा एक थर द्यावा. त्यावरुन बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा एक थर. त्यावर सुके लांबलांब किसलेल्या खोब-याचा एक थर, आणि सर्वात शेवटी खसखस पेरावी.
आता दोन्ही बाजुने या पोळीची एकेक पट्टी वाळावी पुन्हा त्यावर वरीलप्रमाणेच एकेक थर द्यावे. अशा रितीने पोळीच्या पट्ट्या वळवुन प्रत्येक फोल्डवर असे थर येतात. बेसनाची पोळी मोठी असेल तर एकावर एक असे ७ थर येतात. सर्वात शेवटी तिरप्या आकारात चाकुने छेद द्यावे.

आणि तशीच प्लेटमधे वाढावी. या पाटोड्यांबरोबर मसाल्याची आमटी आणि चपाती करतात.
वाढणी/प्रमाण: 
५-६ लोकांसाठी
अधिक टिपा: 
एवढा कुटाणा करुन केलेल्या पाटोड्या टिकत नाहीत हेच ते काय ते एक दुखणं!अरेरे
त्या संध्याकाळपर्यंत सुद्धा रहात नाही. फ्रीजमधे ठेवल्या तर मसाल्याचा सगळा वास, चव निघुन जाते.
माहितीचा स्रोत: 
आई

Tuesday 26 April 2011

खान्देशी पाककृती: कळण्याची भाकरी आणी शेंगदाण्याची हिरवी चटणी

कळण्याची भाकरी:हा प्रकार खान्देशात थंडीच्या दिवसात करतात.
साहित्यः २ किलो ज्वारी + १किलो आख्खे उडीद दळून आणावेत.
काही ठिकाणी नुसत्या उडदाच्याच भाकरीही करतात...त्यासाठी १ किलो उडीदमधे एक मध्यम वाटी ज्वारी टाकावी.
तर हे कळण्याचे पीठ तयार झाले. त्यात जेवढ्या भाकरी करायच्यात तेवढे पीठ घेउन चवीप्रमाणे मीठ टाकावे. कोमट पाण्यात व्यवस्थित रगडुन पीठाचा गोळा तयार करावा. कुठल्याही भाकरीच्या पीठाला जेवढे रगडले तेवढे ते एकजीव होते आणी भाकरीला तडे जात नाहीत. सुरवातीला हातावर कोरडे पीठ घेउन या मळलेल्या पीठाचा छोटा गोळा दोन्ही तळहाताच्या खोलगट भागातच फिरवावा... मधे जाड आणि कडेला बारीक असा हा गोळा नंतर परातीत खाली थोडे कोरडे पीठ पसरावून त्यावर टाकावा व एका हातानेच गोल गोल फिरवत थोडा मोठा करावा.....परातीला भाकरी चिटकु देउ नये...! (भाकरी करण्याच्या टिपिकल पद्धतीत, खाली बसुन दोन्ही पायाच्या अंगठ्यात परातीची कडा धरुन पीठ रगडतात म्हणजे जोर चांगला लागतो असे म्हणतात तसेच भाकरी मोठी करायलाही सोपे जाते). आता एका बाजुने भाकरी हळुच उचलुन दोन्ही तळव्यांवर खालच्या कोरड्या पीठाचा भाग वरती येइल अशा रितीने उचलावी (भाकरीचे पीठ नीट रगडले गेले आहे की नाही हे इथेच पहिल्यांदा कळते स्मित आणि तव्यावर थोडे तेल पसरुन टाकावी...म्हणजे भाकरीला फुगे येत नाहीत. आता भाकरीच्या वरच्या बाजुला पाणी गोल फिरवत लावावे...म्हणजे आणि ते पाणी वाळायच्या आत ती भाकरी उलथावी...(पाणी वाळल्यावर भाकरी उलटवली तर तडे जातात) गॅस जोरातच असावा...आता भाकरी त्या बाजुने थोडीशी शेकली की तवा काढुन टाकावा....भाकरी त्याच अवस्थेत उलथणे आणि सांडशी (किंवा दुसरे उलथणे)यावर पेलत डायरेक्ट गॅसवर शेकावी...म्हणजे छान पोपडा येतो! सांडशी आणि उलथणे यावर ती भाकरी शेकत जाईल तशी तशी पेलवत फिरवावी...सगळ्या बाजुने झाल्यावर टोपलीत टाकावी.... हो डब्याऐवजी काड्यांच्या टोपलीत भाकरी ठेवतात. आता भाकरीचा पोपडा एका बाजुने मोकळा करावा...म्हणजे आतील वाफ रिलीज होते.
या भाकरीचा पिज्झा स्मित करायचा असेल तर तव्यावरच पोपडा काढुन त्यावर लाल तिखट + लसुण +जिरे कांडुन (ठेचुन) केलेला तिखटाचा गोळा टाकावा तो तेल टाकुन व्यवस्थित पसरावा.वरुन पुन्हा पोपडा दाबुन टाकावा...थंडीमधे नाष्ट्यालाच काय रात्रीच्या जेवणालाही हा गावरान पिज्झा मस्त लागतो.
 कळण्याच्या भाकरीबरोबर, शेंगदाण्याची हिरवी चटणी करतात.

(नेटवरुन टाकलेला फोटो! )
शेंगदाण्याची हिरवी चटणी: थोडे शेंगदाणे भाजुन आणी हिरव्या मिरच्या थोड्या तेलात शेकुन कोथिंबिर, लसुण जि-याबरोबर मिक्सरमधे थोड्या पाण्यात फिरवाव्या. यात चवीप्रमाणे मीठ घालावे. ही चटणी मिक्सरमधे करण्यापेक्षा वरवंटा पाट्यावर वाटलेली असेल तर अजुनच टेस्टी!

Saturday 23 April 2011

अहिराणी भाषेतील जात्यावरच्या ओव्यांचा संग्रह-अर्थासहीत! !!!

नमस्कार! जात्यावरल्या अहिराणी भाषेतील ओव्यांचा खजिना आज तुमच्यापुढे खुला करत आहे. खरतर सुमारे २ वर्षापुर्वीच हा माझ्या हाती आला होता. हे मला ज्यांच्याकडुन मिळाले त्यांच्यापैकी सर्वात महत्वाची व्यक्ती म्हणजे माझी मोठी आत्या विमलबाई दुसाने या आता हयात नाही (जाने.२०११ मधेच त्यांचे निधन झाले) दुर्दैवाने त्यांच्या हयातीत हे मला इथे मांडता आलं नाही....काही काही सल आयुष्यभर रहातात. हेच खरं अरेरे .. तरीसुद्धा ही त्यांना माझ्यातर्फे विनम्र श्रद्धांजली. दुस-या म्हणजे माझ्या मोठ्या काकु प्रमिला वानखेडे आणि माझी आई विजया वानखेडे यांच्या पाठगुळी बसुन मी हे सगळं लिहुन घेतले होते. त्यांचीही मी ऋणी आहे.

त्यांच्याकडुन जी माहिती प्राप्त झाली ती याप्रमाणे:
पुर्वी लहानपणीच मुला-मुलींची लग्न होत असल्याने सासु-सुन किंवा सासुरवास अशा गोष्टी या ओव्यांमधुन दिसत नाही. हं...मधुनच जावा-जावांचे खटके किंवा नणंद-भावजयांचे टोमणे जाणवतात. माझी आई तर नेहमी म्हणे : अगं आधी आईच्या हाताखाली सुन म्हणुन रहावं लागतं नंतर सासुच्या! पहाटे नणंद भावजयी दोघींनाही पहाटे उठुन जात्यावर ४-४ शेराचं (म्हणजे ८ किलो/पायलीभर) दळण करावं लागे. आधी घट्याची/ जात्याची हळद-कुंकु वाहुन पुजा करण्यात येइ. एवढं दळण दळतांना गाण्यात येणा-या ओव्यांमधे काही परंपरागत तर काही लगेच सुचलेल्या ओव्यांचा समावेश असे. मग त्यात नणंद-भावजयींचे खटके असो, त्या त्या काळातली परिस्थिती असो, माहेरासारखा जिव्हाळ्याचा विषय असो कि अध्यात्म...सगळ्यांचच प्रतिबिंब दिसतय. माझ्या अल्पमतीप्रमाणे मी प्रत्येक ओवीचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलाय.

सकाये उठुनी रामाच नाव घेऊ
मंग धरतीमातेवर पाय देवा ठेऊ


प्रभाते मनी राम चिंतित जावा... यासारखे श्लोक या अशिक्षित स्रियांनी कसे जाणले असतील बरे? आख्ख्या जगाचा भार वाहणा-या या पृथ्वीमातेवर पहाटेच्या समयी पाय ठेवण्याआधी रामाचे नाव घेउ.

सकाये उठीसन झाडु वट्याची पायरी
माले गं सापडनी लड मोत्याची गुह्यरी


पहाटे उठुन ओटा, आंगण झाडुन सडासंमार्जन करतांना जे आत्मिक समाधान मिळते ते म्हणजे अगदी मोत्याची लड सापडल्यावर होणा-या आनंदासारखं आहे.

अंगणात खेळे बाळ कोणाचा लह्यरे
त्याच्या गं कमरेत साखळी दुह्यरे


अरेच्चा! सकाळी सकाळी हा कमरेला दुहेरी साखळी बांधलेला कोणाचा बाळ अंगणात खेळतोय? सारवलेल्या अंगणात बाळकृष्णासारखा दिसतोय...

शेजी घाले सडा, मन्हा सड्याला भिडूनी
नादान हरी मन्हा, आला रांगोळी मोडोनी


शेजारीण माझ्या सड्याला जोडुन सडा टाकतेय! मोठमोठे सडा टाकायचं किती ते कौतुक.... पण माझ्या नादान हरीने रांगोळी मोडली की!

पह्यले गाऊ ओवी गं रामराया सजनाला
गाडीवर जाती, घुंगरु त्याच्या इंजनाला


पहिली ओवी गाऊ माझ्या धन्याची.. .. त्यांच्या गाडीच्या इंजनाला घुंगरु बांधलेत याचं कोण कौतुक!!

पारोळ झालं जुनं, नाशिक जमाबंदी
कोनी हौसानं बांधिली, आरधी मुंबै पान्यामंदी


त्याकाळात आपल्या गावापेक्षा मोठं, स्वप्ननगरीसारखं शहर म्हणजे मुंबई आणि मुंबै बघणे म्हणजे जीवाची मुंबई करणे हे गावातल्या कित्येकांचं स्वप्न असायचं! धुळ्याजवळ असणारं पारोळा ही आता जुनं झालं इतकच काय नाशिक ही आता नको... ! पण मुंबई हे बेट होतं हे ही ह्या सासुरवाशिणीला माहितीये. म्हणुन ती म्हणतेय कोणी हौसेनं ही मुंबई अर्धी पाण्यात बांधलीय.

काय पुण्य केलं तुम्ही नाशिकच्या बाया
गंगेची आंघोळ, दर्शनाला रामराया


त्याकाळी, पिकनीक, ट्रीपा/ टुर असं काही नाहीच. तीर्थक्षेत्री जाऊन थोडंफार स्थलदर्शन व्हायच. इतकच. नाशिकच्या बायकांनी असं कोणतं पुण्य केलय की त्यांना रोज गंगेची(गोदावरी) आंघोळ आणि रामरायाचं दर्शन होतं. इथे आम्हाला वर्षातुन एकदा ही कोणी तीर्थक्षेत्री नेत नाही....

काय पुण्य केल तुमी, नाशिकचे लोक
गंगेची आंघोळ, दर्शनाला गायमुख


नाशिकच्या लोकांचं ही पुण्य महान की त्यांना रोज गोमुखाचं दर्शन होतं!

रामकुंडावरी ढवळ्या धोतराची जोडी
आंघोळीला येती रामलक्ष्मणाची जोडी

रामकुंडावरी ओल्या धोतराचा पिळा
आंघोळीला येती साधुसंताचा मेळा

आरध्या रात्री कोण चालला एवढ्या राती
महादेव पार्वती हा कंदील डाव्या हाती


मध्यरात्री १२ वाजले की शिव-पार्वतीचा फेरा येतो म्हणतात... आणि तेव्हा त्यांना जिथे दु:ख दिसेल तिथे ते दूर करतात असं म्हणतात.

देवा रे महादेवा, काय बसला डोया लाई
पृथमी ( पृथ्वी) ढुंढल्यानी जोडी मारुतीला न्हाई


अरे महादेवा, भोळ्या शंकरा असा डोळे मिटुन काय बसलायस? आख्ख्या पृथ्वीवर मारुतीला जोडी नाही काय?

भोळा रे शंकर, भोळं तुझं घेण देण
तुझ्या बेलामधे मला सापडल सोनं

राम-लक्ष्मण नि ही तिसरी सिताबाई
पृथमीमधे जोडा मारुतिला न्हाई


राम सितामाई ही कुटुंबवत्सल जोडी! जिथे रामाने एकीकडे भावाला (लक्ष्मणाला) ही बरोबर ठेवले एकीकडे पत्नीलाही तेवढाच दर्जा दिला. पण आख्ख्या पृथ्वीवर बिचार्‍या मारुतीला जोडी सापडली नाही. तो ब्रम्हचारीच राहिला.

सिता सांगे कथा तिन्ह्या करमनी (कर्माची)
राम सांगे कथा देवधरमनी (देवधर्माची)

सिता तिच्या कर्माची कथा सांगते तर राम धर्म न्याय अशा गोष्टी करतो. सिता तिच्या दुर्दैवाला कोसतेय तर राम तिला पितृवचनपालन वै. धर्म शिकवतो.

शितेला सासरवास रामाच्या मावशीचा
असा वाळुन गेला हिरवा बाग तुळशीचा

रामाने तर वनवास भोगला...पण खरा उन्हाळा सोसला सितेने. एकीकडे कैकयीचा सासुरवास नंतर रामाबरोबर वनवास आणि लंकेत गेल्यावर विजनवास! तिच्या दु:खाने हिरवागार तुळशीची बाग ही वाळुन गेलीय.

सितेला सासुरवास रामाला कसा कळे
रामाचे रामफळे रुमाले रस गळे

सितेला घडणा-या सासुरवासाने रामही बेचैन आहे इतका की रामफळातुन रुमालाने टिपुनही रस गळतोय.

सितेला सासरवास, सासू कैकयीने केला
रामासारखा भरतार हिने भोगु नाही दिला


सासु कैकयीने सितेला इतका सासुरवास केला की , रामासारख्या एकपत्निव्रत, एकनिष्ठ, पुरुषोत्तम अशा पतीबरोबर सुद्धा तिला संसारसुख भोगता आले नाही.

गरीब दुबळा (कसा ही असो) बंधु गं असावा
दिवाळी दसरा एका रातीचा इसावा

सासुरवाशिणीला आधार फक्त भावाचा असतो. म्हणुन इथे ती म्हणतेय की गरीब दुबळा कसाही असो भाऊ असावा.... दिवाळी दसरा या सणासुदीला माहेरी जायला मिळते....तेवढाच सासरच्या धबडग्यातुन एका रात्रीचा विसावा!

भाऊ बहिणीचं भांडण तिथ कशाचा रागरोस
भाऊला ओवाळायला, भाऊबिजेचा एक दिस

अरे भाऊराया, आपलं ते भांडण काय अळवावरचं पाणी. तिथ कशाला रागरोस ठेवायचा. भावाला ओवाळण्यासाठी भाऊबिजेचा असा एकच दिवस असतो.

शिंपीच्या दुकानी उच्च खणले मारु खडा
शिंपी भाऊ मोठा येडा, भाऊ बहिणीना सौदा मोडा

शिंप्याच्या दुकानात चोळीचा खण थोड्या जास्त किंमतीचा आहे. पण तो मूर्ख शिंपी त्याची किंमत अधिक सांगुन भाऊ बहिणीचा सौदा मोडतोय.

पापी रे मानसा, हा बसला बाजारात
लोकाची लेक बाया याने घेतली नजरात

बाजारात कसले कसले लोक येतात. त्यांच्या नजरा दुस-याच्या बायाबापड्यांवर फिरत असतात...अशाच एका नजरेची तिला दळण दळता दळता आठवण होते....आणि दुसरीला सावध करण्यासाठी ती तीला हे ओवीतुन सांगते.

माझ्या घरी गं पाहुणे करु आताचा दहीभात
भाऊ गं पाहुणा, बुंदी छाटु सारी रात

खान्देशातला रोजचा आहार म्हणजे भाजी भाकरी आणि रात्रीची तांदुळाची फोडणीची खिचडी. वरण भात वरुन साजुक तुप वगैरे अगदी सणासुदीलाच होणार...किंवा पाहुण्यांना! आज माझा भाऊ घरी पाहुणा म्हणुन आलाय. त्याच्यासाठी दहीभात तर करतेच पण गोडधोड म्हणुन आख्ख्या रातभर बुंदी छाटावी लागली तरी बेहतर.

झाली संध्याकाळ, संध्याकाळले मान देऊ
स्वर्गी गेले माझे पिता, दिवा लावुन पाणी पिऊ

सायसंध्याकाळी पितरांचा फेरा असतो म्हणुन दिवेलागणीला तुळशीजवळ दिवा लावल्याखेरीज काही खाउ-पिउ नये असं म्हणतात. मुलीवरच्या प्रेमाने आलेला स्वर्गस्थ पित्याचा आत्म्याला तेलाचा दिवा दाखवुन मान देतांना ही सासुरवाशीण असं म्हणते.

आली सही सांज, आला वांझोटीचा फेरा
सांगते सुनबाई, पदराखाली झाक हिरा

नेमकं सांजसमयी कुटाळक्या करणारी वांझोटी शेजी बाई गप्पा मारायला येउन बसते. तिची नजर तुझ्या हि-याला (लहानग्याला) लागु नये म्हणुन सासुबाई इथे सुनेला म्हणते की तुझ्या मुलाला पदराखाली झाकुन ठेव.

माझा भाऊ आला आज, माझा भाचा आला
लई गं दिस झाले, आत्या माहेराला चाल काल

आज मन किती उचंबळुन येतय! कारण माझा भाऊ, भाचा माझ्याकडे आलेत आणि भाचा आग्रह करतोय की किती दिवस झालेत आत्या चल ना गं आमच्या घरी! व्वा...कोणी आपल्या येण्याची वाट बघतय ही कल्पनाच किती रम्य आहे!!

उन्हाळ्याचं उन्ह, ऊन लागे कपाळाला
नादान बंधु माझा, छत्री साजे गोपाळाला

खान्देश म्हणजे कडक उन्हाळा! अशा उन्हाळ्यात उन्हातान्हात भाऊ मला भेटायला येतोय. छत्री घेउन येतांना भाऊ किती साजेसा दिसतोय.

सासु आत्याबाई, तुमच्या पदराला ववा(ओवा)
जाते माहेराला, माझ्या पतीला जीव लावा

पुर्वी नात्यातली लग्न म्हणजे भावाची मुलगी आत्याने सुन करुन घ्यायची असे व्यवहार होत. सासवांच्या पदराला सुपारी, ओवा असं काय काय बांधलेलं असे. भाऊ घ्यायला आलाय, माहेराला तर जायचय ...पण इकडे सासरही सोडवत नाही. धन्याची चिंता ...आता आई आपल्या मुलाची काळजी घेइलच! पण सासुरवाशीण तरीही माहेरी जातांना सासुला सांगुन जातेय की पतीला जीव लावा...त्यांच्या खाण्यापिण्याची हेळसांड करु नका.

शिता भावजाई, तुझा गं मला राग येतो
चतुर भाऊ माझा हाताने पाणी घेतो

माहेरी आल्यावर एकेक चित्र उलगडत जातय. सिता भावजाईचा तोरा इतका की भाऊही तिच्या ताटाखालचं मांजर बनलाय. म्हणुन इथं ती म्हणते की तुझा राग येतो कारण इतका माझा हुशार, चतुर भाऊ ...पण आज अशी वेळ आलीये की त्याला स्वतः हाताने पाणी घ्यावं लागतय.

वडील माझा लेक देर जेठच्या बरोबरी
पुसती जन लोक कुठे गेले हो कारभारी

माझा मोठा मुलगा दीर-जेठाच्या बरोबरीला आलाय... तरी दुरदेशीला गेलेला धनी अजुन परतला नाही. आजबाजुचे लोक आडुन आडुन चौकशी करतात की कारभारी कुठे गेलेत?


गावातल्या गावात भाऊ बहिणीशी बोलेना
आस्तोरी(बायको)च्या पुढे त्याचा विलाज चालेना

कधी कधी बहिण-भावांचे खटके उडतात. म्हणुन बहिण खंत व्यक्त करतेय की गावातल्या गावात दिलय तरी भाऊ बोलत नाही...त्याच्या अस्तुरी(बायको)पुढे काही इलाज चालत नाही.

गावातल्या गावात साला बहिणोईचं नातं
भाऊ कसा म्हणे नित्य होतो रामराम

बहिणीला गावातच दिलय....लहान गाव असल्याने नित्य कुठे ना कुठे पाव्हण्याचं (मेव्हणा) दर्शन होतच.

भाऊ गं आपला, भावजाई गं लोकाची
तिच्या गं पोटची, भाची गं आपल्या गोताची


फुरंगटुन ही सासुरवाशीण म्हणते, भाऊ शेवटी आपला ...आपलं नातं रक्ताचं पण भावजाई शेवटी लोकाची पोर. हो, पण तिच्याच पोटची भाची ही आपल्या गोताची म्हणजे तिच्याही अंगात भावाचं पर्यायाने आपलंच रक्त खेळतय.

सांगस भाऊ तुले भेटी जाय उन्हाळ्यात
पानीपाऊसना माले, चार महिना धाक

भावाला सुचवलं जातय की दर उन्हाळ्यात भेट देऊन जा रे.... पावसाळ्याचे ४ महिने नदी-नाल्यांना/ओढ्यांना पाणी असतं, बैलगाड्या पैलतीरी जाउ शकत नाही. म्हणजे या काळात आपली भेट होणं तसं मुश्किलच.

मामा गं भाच्याची झुंज लागली खिंडीत
पुसती जनलोक मायलेकीचा पंडीत

मामा-भाचे...एक मायेचा पंडीत एक लेकीचा पंडीत.खिंडीत झुंजतायत...लुटुपुटुची लढाई! यात हरणार कोण जिंकणार कोण हे थोडच महत्वाचं! मामा भाच्याला ट्रेन्ड करतोय हे काय कमीये का?

नणंद भावजाया आम्ही एका चालणीच्या
बाहेर गं निघाल्या सुना कोण मालणीच्या

आम्ही नणंद भावजाया नटुन थटुन बाहेर निघाल्या की लोकही पुसतात की या सुना कोणाच्या?

देराण्या जेठाण्या आपण काळ्या साड्या नेसु
बाहेर गं निघु सुना वकीलाच्या दिसु

वकील, बॅरीस्टर, डॉक्टर आणि शिक्षक हे तसे त्याकाळातले मानमरातब प्राप्त पेशे. आम्ही जावा-जावा जेव्हा काळ्या साड्या नेसुन बाहेर निघु तर अगदी जशा वकिलाच्या सुना!

दिवाळीच्या दिवशी माझ्या ताटातले गहू
असे ओवाळीले पाची पांडव माझे भाऊ

मोठ्या दिमाखाने ही सासुरवाशिण म्हणतेय दिवाळीच्या दिवशी माहेरी आल्यावर माझ्या पाच पांडवांसारख्या भावांना असे ओवाळीले आणि भरभरुन आशिर्वाद दिले ( भाऊ नेहमी बहिणीचा नमस्कार करतात, पण बहिण कधी भावांचा नमस्कार करत नसते एवढच काय भाच्यांनीही कधी मामाचा नमस्कार करायचा नसतो...अशी मानता होती)

दिवाळीच्या दिवशी माझ्या ताटामधे मिरे
असे ओवाळीले मायबाई तुझे हिरे

मायेला/आईलाही सांगुन ठेवते की दिवाळीच्या दिवशी तुझ्या ह्या हि-यांना मी ओवाळलेय.

माय माय करु , माय तांबानी परात
मायवाचुनि चित्त लागेना घरात

पण मधेच का आईच्या आठवणीने मन सैरभैर होतय? मुल कितीही मोठं झालं तरी आई घरात नसली की केविलवाणं होतं. म्हणुनच म्हणतात ना :
"आई म्हणजे एक नाव असतं
घरातल्या घरात एक गाव असतं"
बघा ना इथे तर ही सासुरवाशीण सासरी रमलेली आहे, एका मुलाची आई आहे तरी माहेरी आल्यावर आई दिसली नाही की कावरी बावरी होते.

मायेने दिल्या घुट्या जायफळ-एखंडाच्या
काम करी करी माझ्या दंड-बाह्या लोखंडाच्या

आपल्या आईचं कौतुक करतांना ही अभिमानानं सांगतेय की आईने लहानपणी जायफळ-वेखंडाच्या बाळघुट्या दिल्या म्हणुन आज मला कितीही काम पडु दे त्याची चिंता नाही. काम करकरुन माझे दंड लोखंडासारखे झालेत.

काम करती नारी, तुले काम करी जाऊ
माऊलीनं दूध, मी हारले ना जाऊ

पुर्वीच्या काळी स्त्रियांना दळण, कांडणं, सडा-सारवणं, धुणी-भांडी एवढी कष्टाची कामं करुन पुन्हा शेतावरही जावं लागे. इथे ही स्त्री म्हणतेय कितीही काम पडो.... मी हरणार नाही. माझ्या आईच्या दुधाचा अपमान मी होऊ देणार नाही.

भाऊ करु याही, बाप म्हने नको बाई
आताना भावजाया मान ठेवणार नाही

भावाला व्याही करायचय पण इकडे बाबा म्हणतात की नको ग बये, आताच्या भावजया मान ठेवत नाही. मुलगी दिली तरी ती कमीपणा घेणार नाहीच्...उलट भावजयीचच नाक वर राहील.

जाउ माहेराले, उभी राहु एकीकडे
भाचाले लेऊ कडे, भावजाई पाया पडे

भारतीय संस्कृतीत 'अतिथी देवो भव' असलं तरी ते तेवढचं मर्यादीत आहे. 'चार दिवसांचा पाहुणा..' असं गावाकडे म्हणतात....४ दिवसांच्या वर पाहुणे राहिले तर तो पाहुणा रहात नाही म्हणजे त्याचं तसं आदरातिथ्य ठेवलं जात नाही.सासरहुन माहेरी गेलेली मुलगी एकाकी एकीकडे उभी रहाते पण भाच्याला कडेवर घेतलं की भावजईची स्वारी खुश...मग हसत हसत ती पाय पडायला येते.

भाऊ करी याही, माले भाचीसून सोभे
तोडा पैंजनानं मन्ह तळघर वाजे

भावजाई आपली नाही तरी भाची माझी गुणाची. भावाला व्याही करुन भाचीला सून केलं तर तिच्या पैंजणांच्या मधुर आवाजानं माझं सगळं घर भरुन जाईन.

भाऊ करु याही माले पैसानी जोखम
भाची करु सून पोरी चांदीनी रकम

लखोपती भावाच्या नक्षत्रासारख्या मुलीला सुन करुन घेतलं तर तिच्या पावलांनी घरात भरभराट येइल.

गाडीमागे गाडी, एक गाडी आरशाची
भाऊले झाया लेक, चिठ्ठी आली बारशाची

दारात गाडीमागे गाडी कोणाची आलीये? हं, आरशाची गाडी म्हणजे भावाचीच. भावाला लेक झालाय त्याच्या बारशाचे आमंत्रण द्यायला भाऊ स्वतः आलाय.

नादान मनू मन्ही, तुन्हा परकराले मोती
धुळ्यात नांदती, मामा तुझे लखोपती

माझी निरागस मुलगी तिच्या परकर पोलक्याला मोती जडलेले आहेत. ऐकलस का गं धुळ्यात रहाणारे तुझे मामा लखोपती आहे म्हणुन ही हौस बरं! भावाचं कोण कौतुक!

देव रे मारुति, हा पानीना सगरले
कशी पडु पाय, दोन्ही हात घागरले

सकाळी नदीवर पाणी भरायला गेले तर वाटेतल्या मारुतिला नमस्कार करत येत नाही याची केवढी खंत वाटतेय! डोक्यावर एकावर एक २ घागरी, कमरेवर एक घागर आणि दुस-या हातात एक अशा परिस्थितीत असल्यावर मारुतिला नमस्कार करु कशी?

राम-लक्ष्मण ही तिसरी सितामाई
रामाच्या पुढे चाले हा मारुति ब्रम्हचारी


गायनं गोमतीर माझ्या अंगणी बाह्यरेला
दूर नि ओळखला माझ्या भाऊचा हिरवा शेला


गायीचं गोमुत्र गोठ्यातुन अंगणात वहातय. हा लांबुन येणारा हिरवा शेला घातलेला माणुस म्हणजे नक्की माझा भाऊच.

भाऊ जाते बहिणीच्या गाई, घोडा बांधतो जाळीला
पह्यले भेट पाव्हण्याला, मग भेटजो बहिणीला

बहिणीच्या सासरी गेलेला भाऊ आपला घोडा जाळीला बांधतो. बहिण त्याला हळुच खुणावतेय की आधी पाव्हण्याला (मेव्हण्याला) सासु सास-यांना भेटुन मगच मला भेटायला ये.
बहिणीच्या सासरी सगळ्यांचाच मान ठेवावा लागतो... नाहीतर नंतर बहिणीला टोचणुक होते. एवढ्च काय भेटायला गेलं तरी आधी मेव्हण्याची, तिच्या सासु-सास-यांची विचारपुस करावी लागते. नंतरच बहिणीला भेटता येतं.

लिंबाच्या लिंबोळ्या लिंबाखाली पसरल्या
पोटी आल्या लेकी, बहिणी भाची इसरल्या

हा थोडा तिरकस शेरा भाऊ-भावजईला की तुमच्या पोटी लेकी आल्या तर तुम्ही बहिणी भाच्यांना पण विसरलेत? पुर्वीसारखी हौसमौज होत नाही माहेरी आल्यावर.

कोण्या गाई(गावी) गेला, माझ्या पाठीचा रंगेला
असा सुना लागे, तुन्हा बैठकी बंगला

भावजईला उद्देशुन ही म्हणतेय की शेवटी घरधन्याशिवाय घराला शोभा नाही...तुझा हा बैठकी बंगला तुलाच लखलाभ होवो. माझ्या पाठचा भाऊ लांबच्या अशा कुठल्या गावाला गेलाय की त्याच्याशिवाय हा बंगला ही सुना सुना वाटतोय.

सोनाराच्या मुला, नको जाऊ देशोदेशी
हाती घेतली सांडशी, आता होतील गणपती

सोनारी कामात सांडशी किंवा पकड हा एक महत्वाचा भाग आहे. हाती घेतली सांडशी- आताच काम आलय.. हातात सांडशी घेतलीय...आणी गणपती झाले की दिवाळी दसरा म्हणजे आपली सुगी./कामं चालु होतात ...मग दुरदेशी जाण्याची का हौस तुला?

सईबहीना जोडु, माझ्या सारखी रंगिली
सगळ्यात चमकली, हुभ्या खांबाची बिजली

माझ्या मैत्रीणी माझ्यासारख्याच हौशी आहेत. लाखात एक अशी माझी सईबाई उठुन दिसते.

सईबहिना जोडु, मुसलमाननी सारजा
कपाळना कुंकू तिन्हा रामनी वरजा

खान्देश- मुसलमानी राजवटीमुळे त्यावेळच्या परिस्थितींच दर्शन अशा ओव्यातुन होतं ! खानांचं राज्य होतं ...पण हिंदु-मुस्लीम तेव्हा गुण्यागोविंदाने रहात होते. ब्रिटीशांनी नंतर यात फुट पाडली. शेजारी रहाणारी मुस्लीम सारजा हिसुद्धा माझी सईबहिणच.... तिच्या देवांनी तिला कपाळाचं कुंकू वर्ज्य सांगितलय म्हणुन काय झालं!

पंढरीच्या वाटे, कोणी लावली सुपारी
खरेदी करे हा पंढरीचा बेपारी(व्यापारी)


सरीले दळण, माझी सरती स्वस्तकी
तलवारीचा मार, हेल्याच्या मस्तकी

* हेला: रेडा. पुर्वी हेला म्हणजे रेडा याचा बळी द्यायची पद्धत होती. त्याचा संदर्भ इथे आहे.

सरीले दळण, माझी सरती आईका(ऐका)
माझ्या संगतीला, नामदेवाच्या बायका

दळण संपत आले, आता माझी शेवटची ओवी ऐका! आज अशा एकावर एक इतक्या सुंदर ओव्या सुचल्या की जणु काय माझ्या संगतीला संत नामदेवांच्या घरच्या बायका होत्या.

सौजन्यः माझी आत्या- कै.विमलबाई दुसाने, धुळे
काकु- प्रमिला वानखेडे, धुळे
आई- विजया वानखेडे, पुणे              

Friday 22 April 2011

खानदेशी पाककृती: बाजरीची खिचडी/ ढासले

लागणारा वेळ: 
२० मिनिटे
 
लागणारे जिन्नस: 
बाजरी : एक किलो
तांदुळः अर्धी वाटी
तुरीची दाळः अर्धी वाटी
गुळ, साजुक तुप, मीठ नेहमीप्रमाणे

तिखट करायची असल्यासः फोडणीसाठी १-२ मध्यम आकाराचे कांदे चिरुन, ओले वाटाणे, शेंगदाणे, लसुण, हिंग, चवीप्रमाणे लाल तिखट, मीठ आणि थोडासा गरम मसाला
क्रमवार पाककृती: 
ढासले : म्हणजे बाजरीची खिचडी म्हणा हवे तर.
७-८ माणसांसाठी एक किलो बाजरी धुवुन निथरुन ठेवावी...थोडीशी सुकल्यावर ओलसर असतांनाच कांडावी. पाखडावी म्हणजे टरफले निघुन जातात. नंतर चाळणीने चाळुन घ्यावी ..म्हणजे पीठ, कोंडा काढता येतो. आता ही बाजरी त्यात अर्धी अर्धी वाटी तांदुळ ( खिचडीचा) आणि दाळ (तुरीची किंवा हरभ-याची) घालुन मीठ, किंचीतशी हळद , हिंग घालुन कुकरमधुन २-३ शिट्ट्या करुन काढावी. खिचडीला पाणी जास्त लागते कारण बाजरी आणी तुरीची दाळ! गरमागरम खिचडीवर गुळ, तुप घालुन खातात.
थंडीच्या दिवसात उत्तम.
हीच खिचडी आम्ही तिखट करतो. कांदा, लसुन, हळद, हिंग,लाल तिखट, शेंगदाणे, (ओले वाटाणे ही घालतात)घालुन फोडणी करुन घ्यावी. त्यात पाणी ओतुन वर सांगितल्या प्रमाणे पाखडलेली बाजरी, तांदुळ, तुरीची दाळ धुउन टाकावे. ही खिचडी शिजत असतांनाच असला खमंग वास पसरतो कि यंव!!! स्मित खिचडी शिजली की वरुन चिरलेली कोथिंबिर पसरावी.
वाढणी/प्रमाण: 
७-८ जणांसाठी
अधिक टिपा: 
खान्देशी माणुस आणि खिचडीच वेगळच नातं आहे. खिचडी आणी वर तेलाचीच(शेंगदाणा/गोडेतेल) धार...कसली सर नाही त्याला. आणि हो, तेल कच्चेच असावे...
मग त्याबरोबर कैरीचेच लोणचे, पापड, हा सरंजाम असला किंवा नसला तरी चालते.
माहितीचा स्रोत: 
आई

Thursday 21 April 2011

मी ते घागर धरी धरी नाचु वं माय !

आंग्या पांग्या ना संसार नही कराव माय
मी ते घागर धरी धरी नाचु वं माय !

मी ते शेतकरी नवरा नई कराव माय
यान्हा पायल्या ना भाकरी कोन करी माय
मी ते घागर धरी धरी....!

मी तं पोलीस भरतार नइ कराव माय
यान्हा पट्टानी पालीस ( पॉलिश) कोन कराव माय
मी ते घागर धरी धरी....!

मी तं मास्तर भरतार नही कराव माय
यान्हा पगारना नोटा कोन मोजी माय
मी ते घागर धरी धरी...!

मी तं साह्येब भरतार करसु वं माय
त्यान्हा गयामां हात घाली फिरसु वं माय
मी ते घागर धरी धरी नाचु वं माय!

Tuesday 19 April 2011

कोन गाव परनाले जाशी वं मना रसिक राजा

कोन गाव परनाले जाशी वं मना रसिक राजा
कोन गाव परनाले जाशी वं मन्हा रसिक राजा ||
काय बांधी उना वं मन्हा रसिक राजा
घड्याळ बांधी उना वं मन्हा रसिक राजा
कस्सानं घड्याळ न कस्सानं काय
डेडोर ( बेडुक??) बांधी उना वं मन्हा रसिक राजा ||
कोन गाव परनाले जाशी वं मना रसिक राजा....

काय बांधी उना व मन्हा रसिक राजा
पोयतं बांधी उना वं मन्हा रसिक राजा
कस्सा न पोयत न कस्स न काय
नाडा बांधी उना वं मन्हा रसिक राजा ||
कोन गाव परनाले जाशी व मन्हा रसिक राजा...

काय बांधी उना वं मन्हा रसिक राजा
बाशिंग बांधी उना वं मन्हा रसिक राजा
कस्सा न बाशिंग नि कस्सा न काय
सुपडं बांधी उना व मना रसिक राजा ||
कोन गाव परनाले जाशी व मना रसिक राजा

गड पर से आयी मेरी मां, मां ने वन्दन करो

गड पर से आयी मेरी मां, मां ने वन्दन करो
गड पर से आयी मेरी मां, मां ने वन्दन करो

सुतार दिर मन्हा आओ, मां ने बाजट लाओ
सुतार दिर मन्हा आओ, मां ने बाजट लाओ
बाजट पर बैठी मेरी मां, मां ने वन्दन करो
गड पर से आयी मेरी मां, मां ने वन्दन करो

सोनार दिर मन्हा आओ, मां ने कमरपट्टा लाओ
कमरपट्टा पहनी मेरी मां, मां ने वन्दन करो
गड पर से आयी मेरी मां, मां ने वन्दन करो

दर्जी दिर मन्हा आओ, मां ने चोली सिलावो
चोली को पहनी मेरी मां, मां ने वन्दन करो
गड पर से आयी मेरी मां, मां ने वन्दन करो

कासार दिर मन्हा आओ, मां ने कन्गन लाओ
कन्गन को पहनी मेरी मां, मां ने वन्दन करो
गड पर से आयी मेरी मां, मां ने वन्दन करो

सज धज के बैठी मेरी मां, मां का रुप निहारु
सजधज के बैठी मेरी मां, मां का रुप निहारु
गड पर से आयी मेरी मां, मां ने वन्दन करो

पहिलं नमन खान्देश कवियित्री बहिणाबाई चौधरी यांना

अरे संसार संसार, जसा तवा चुल्यावर
आधी हाताला चटके, तवा मिळते भाकर

अरे संसार संसार, खोटा कधी म्हणू नये
राऊळाच्या कळसाला, लोटा कधी म्हणू नये

अरे संसार संसार, नाही रडणं, कुढणं
येडया गळयातला हार, म्हणू नको रे लोढणं

अरे संसार संसार, दोन जीवांचा विचार
देत सुखाला नकार, आणि दुखाःला होकार

अरे संसार संसार, खिरा येलावरला तोड
येक तोंडामधे कडु, बाकी अवघा लागे गोड

अरे संसार संसार, म्हनु नको रे भिलावा
त्याले गोड भीमफुलं, मधी गोडंब्याचा ठेवा

देख संसार संसार, शेंग वरतुन काटे
अरे वरतुन काटे, मधे चिक्ने सागरगोटे

देखा संसार संसार, दोन्ही जीवांचा सुधार
कधी नगद उधार, सुखादु:खाचा बेपार

अरे संसार संसार, असा मोठा जादुगार
माज्या जीवाचा मंतर, त्याच्यावरती मदार

असा संसार संसार, आधी देवाचा ईसार
माज्या दैवाचा जोजार, मग जीवाचा आधार

-कवयित्री बहिणाबाई चौधरी