थोडं इतिहासात डोकावुया:
असं म्हणतात की विंध्याचल पर्वत ओलांडुन दक्षिणेत गोदातीरी वास्तव्य करणारे 'अगस्त्य/अगस्ती' ऋषी हे पहिले आर्य. प्राचीन काळी खान्देशाचे नाव 'रसिक' होते.

त्या काळात सम्राट अशोकाच्या अंमलाखाली हा प्रदेश होता. त्यांच्यानंतर 'संगा' घराण्यातील 'पुष्यमित्र' याने मौर्यांना इथुन दूर करुन राज्य केले. त्याच्याही नंतर सातवाहन राजांनी हा प्रदेश काबिज केला.

इ.स. २५० मधे अभिर/ अहिर राजांनी आक्रमण करुन सातवाहनांना दुर केले आणि इथे अनेक वर्ष राज्य केले. इ.स. ३१६- ३६७ या काळात इथे महाराजा रुद्रदास, महाराजा स्वामीदास, महाराजा भुलुंडा ह्या अहिर राज्यांनी राज्य केले. हे अहिर राजे उत्तर हिंदुस्थानातुन इकडे आले. पशुपालन /शेती हा जरी त्यांचा व्यवसाय होता तरी ते लढवय्ये होते. त्यांची भाषा अहिरवाणी किंवा अहिराणी ही खान्देशातली भाषा आहे. खर तर खान्देश परगण्याला तीन जिल्ह्यांच्या परिसिमा लाभलेल्या आहेत. महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि गुजरात. तिन्ही राज्यांच्या भाषा मिळुन अशी अहिराणी भाषा बनलेली आहे.

काही काळ यादव कुळातील सेउनचंद्र राजाने इथे राज्य केले त्याच्या नावावरुन 'सेउनदेश' असे नाव पडले. नंतर गुजरातेतील फारुकी राजे अहमद१ या खानांच्या नावावरुन 'खान्देश' असे नाव झाले. सातवाहनांनंतर वाकाटक, राष्ट्रकुट, चालुक्य राजांकडुन हा प्रदेश १३व्या शतकापर्यंत देवगिरीच्या यादवांकडे आला. अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणानंतर १२९४ मधे हा प्रदेश त्याच्या ताब्यात गेला होता. १३७० पर्यंत खिलजीने राज्य केले. त्याच काळात थाळनेर आणि करवंदी सुभा सुलतान फिरोज तुघलक याच्याकडुन मलिक राजा फारुकी ला दान देण्यात आला. त्याच्या काळात देवपुर आणि जुने धुळे येथे गढी बांधण्यात आली. दुर्दैवाने १८७२ च्या पांझरेच्या पुरात देवपुरातली गढी वाहुन गेली. धुळ्याजवळच्या लळिंग किल्ल्यावरुन सुलतान फारुकीने इ.स. १६०० पर्यंत धुळ्यावर अंमल गाजवला. इ.स. १६२९ मधे हा प्रदेश मुघलांच्या साम्राज्यात गेला. इ.स. १८०३ मधे पडलेल्या भयंकर दुष्काळामुळे अनेक लोक गाव सोडुन निघुन जाउ लागले तेव्हा, विठ्ठल नरसिंग विंचुरकरांचा सहकारी बाळाजी बळवंत याच्या प्रयत्नाने पुन्हा हे गाव वसले.
१८१८ मधे हा परगणा इंग्रजांच्या ताब्यात गेला. ब्रिटिशांचा सनदी अधिकारी कॅप्टन ब्रिग याने हा विभाग चालवायला घेतला. असं म्हणतात की धुळे शहराची विशिष्ट रचना कॅप्टन ब्रिग यांच्या प्रयत्नातुन साकारली आहे. शहरातुन जाणारा एकच मुख्य रस्ता आणि त्याला काटकोनात जोडणा-या गल्ल्या/ रस्ते ही ती विशेष रचना.

१५ ऑगस्ट १९०० मधे धुळे- चाळीसगाव रेल्वे सुरु झाली. स्वातंत्र्योत्तर काळात १९६० मधे धुळे जिल्हा महाराष्ट्र राज्याला अधिकृतरित्या जोडला गेला.

१ जुलै १९९८ साली धुळे जिल्हा विभागुन 'धुळे' व 'नंदुरबार' असे दोन जिल्हे तयार करण्यात आले.

Tuesday 26 April 2011

खान्देशी पाककृती: कळण्याची भाकरी आणी शेंगदाण्याची हिरवी चटणी

कळण्याची भाकरी:हा प्रकार खान्देशात थंडीच्या दिवसात करतात.
साहित्यः २ किलो ज्वारी + १किलो आख्खे उडीद दळून आणावेत.
काही ठिकाणी नुसत्या उडदाच्याच भाकरीही करतात...त्यासाठी १ किलो उडीदमधे एक मध्यम वाटी ज्वारी टाकावी.
तर हे कळण्याचे पीठ तयार झाले. त्यात जेवढ्या भाकरी करायच्यात तेवढे पीठ घेउन चवीप्रमाणे मीठ टाकावे. कोमट पाण्यात व्यवस्थित रगडुन पीठाचा गोळा तयार करावा. कुठल्याही भाकरीच्या पीठाला जेवढे रगडले तेवढे ते एकजीव होते आणी भाकरीला तडे जात नाहीत. सुरवातीला हातावर कोरडे पीठ घेउन या मळलेल्या पीठाचा छोटा गोळा दोन्ही तळहाताच्या खोलगट भागातच फिरवावा... मधे जाड आणि कडेला बारीक असा हा गोळा नंतर परातीत खाली थोडे कोरडे पीठ पसरावून त्यावर टाकावा व एका हातानेच गोल गोल फिरवत थोडा मोठा करावा.....परातीला भाकरी चिटकु देउ नये...! (भाकरी करण्याच्या टिपिकल पद्धतीत, खाली बसुन दोन्ही पायाच्या अंगठ्यात परातीची कडा धरुन पीठ रगडतात म्हणजे जोर चांगला लागतो असे म्हणतात तसेच भाकरी मोठी करायलाही सोपे जाते). आता एका बाजुने भाकरी हळुच उचलुन दोन्ही तळव्यांवर खालच्या कोरड्या पीठाचा भाग वरती येइल अशा रितीने उचलावी (भाकरीचे पीठ नीट रगडले गेले आहे की नाही हे इथेच पहिल्यांदा कळते स्मित आणि तव्यावर थोडे तेल पसरुन टाकावी...म्हणजे भाकरीला फुगे येत नाहीत. आता भाकरीच्या वरच्या बाजुला पाणी गोल फिरवत लावावे...म्हणजे आणि ते पाणी वाळायच्या आत ती भाकरी उलथावी...(पाणी वाळल्यावर भाकरी उलटवली तर तडे जातात) गॅस जोरातच असावा...आता भाकरी त्या बाजुने थोडीशी शेकली की तवा काढुन टाकावा....भाकरी त्याच अवस्थेत उलथणे आणि सांडशी (किंवा दुसरे उलथणे)यावर पेलत डायरेक्ट गॅसवर शेकावी...म्हणजे छान पोपडा येतो! सांडशी आणि उलथणे यावर ती भाकरी शेकत जाईल तशी तशी पेलवत फिरवावी...सगळ्या बाजुने झाल्यावर टोपलीत टाकावी.... हो डब्याऐवजी काड्यांच्या टोपलीत भाकरी ठेवतात. आता भाकरीचा पोपडा एका बाजुने मोकळा करावा...म्हणजे आतील वाफ रिलीज होते.
या भाकरीचा पिज्झा स्मित करायचा असेल तर तव्यावरच पोपडा काढुन त्यावर लाल तिखट + लसुण +जिरे कांडुन (ठेचुन) केलेला तिखटाचा गोळा टाकावा तो तेल टाकुन व्यवस्थित पसरावा.वरुन पुन्हा पोपडा दाबुन टाकावा...थंडीमधे नाष्ट्यालाच काय रात्रीच्या जेवणालाही हा गावरान पिज्झा मस्त लागतो.
 कळण्याच्या भाकरीबरोबर, शेंगदाण्याची हिरवी चटणी करतात.

(नेटवरुन टाकलेला फोटो! )
शेंगदाण्याची हिरवी चटणी: थोडे शेंगदाणे भाजुन आणी हिरव्या मिरच्या थोड्या तेलात शेकुन कोथिंबिर, लसुण जि-याबरोबर मिक्सरमधे थोड्या पाण्यात फिरवाव्या. यात चवीप्रमाणे मीठ घालावे. ही चटणी मिक्सरमधे करण्यापेक्षा वरवंटा पाट्यावर वाटलेली असेल तर अजुनच टेस्टी!

Saturday 23 April 2011

अहिराणी भाषेतील जात्यावरच्या ओव्यांचा संग्रह-अर्थासहीत! !!!

नमस्कार! जात्यावरल्या अहिराणी भाषेतील ओव्यांचा खजिना आज तुमच्यापुढे खुला करत आहे. खरतर सुमारे २ वर्षापुर्वीच हा माझ्या हाती आला होता. हे मला ज्यांच्याकडुन मिळाले त्यांच्यापैकी सर्वात महत्वाची व्यक्ती म्हणजे माझी मोठी आत्या विमलबाई दुसाने या आता हयात नाही (जाने.२०११ मधेच त्यांचे निधन झाले) दुर्दैवाने त्यांच्या हयातीत हे मला इथे मांडता आलं नाही....काही काही सल आयुष्यभर रहातात. हेच खरं अरेरे .. तरीसुद्धा ही त्यांना माझ्यातर्फे विनम्र श्रद्धांजली. दुस-या म्हणजे माझ्या मोठ्या काकु प्रमिला वानखेडे आणि माझी आई विजया वानखेडे यांच्या पाठगुळी बसुन मी हे सगळं लिहुन घेतले होते. त्यांचीही मी ऋणी आहे.

त्यांच्याकडुन जी माहिती प्राप्त झाली ती याप्रमाणे:
पुर्वी लहानपणीच मुला-मुलींची लग्न होत असल्याने सासु-सुन किंवा सासुरवास अशा गोष्टी या ओव्यांमधुन दिसत नाही. हं...मधुनच जावा-जावांचे खटके किंवा नणंद-भावजयांचे टोमणे जाणवतात. माझी आई तर नेहमी म्हणे : अगं आधी आईच्या हाताखाली सुन म्हणुन रहावं लागतं नंतर सासुच्या! पहाटे नणंद भावजयी दोघींनाही पहाटे उठुन जात्यावर ४-४ शेराचं (म्हणजे ८ किलो/पायलीभर) दळण करावं लागे. आधी घट्याची/ जात्याची हळद-कुंकु वाहुन पुजा करण्यात येइ. एवढं दळण दळतांना गाण्यात येणा-या ओव्यांमधे काही परंपरागत तर काही लगेच सुचलेल्या ओव्यांचा समावेश असे. मग त्यात नणंद-भावजयींचे खटके असो, त्या त्या काळातली परिस्थिती असो, माहेरासारखा जिव्हाळ्याचा विषय असो कि अध्यात्म...सगळ्यांचच प्रतिबिंब दिसतय. माझ्या अल्पमतीप्रमाणे मी प्रत्येक ओवीचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलाय.

सकाये उठुनी रामाच नाव घेऊ
मंग धरतीमातेवर पाय देवा ठेऊ


प्रभाते मनी राम चिंतित जावा... यासारखे श्लोक या अशिक्षित स्रियांनी कसे जाणले असतील बरे? आख्ख्या जगाचा भार वाहणा-या या पृथ्वीमातेवर पहाटेच्या समयी पाय ठेवण्याआधी रामाचे नाव घेउ.

सकाये उठीसन झाडु वट्याची पायरी
माले गं सापडनी लड मोत्याची गुह्यरी


पहाटे उठुन ओटा, आंगण झाडुन सडासंमार्जन करतांना जे आत्मिक समाधान मिळते ते म्हणजे अगदी मोत्याची लड सापडल्यावर होणा-या आनंदासारखं आहे.

अंगणात खेळे बाळ कोणाचा लह्यरे
त्याच्या गं कमरेत साखळी दुह्यरे


अरेच्चा! सकाळी सकाळी हा कमरेला दुहेरी साखळी बांधलेला कोणाचा बाळ अंगणात खेळतोय? सारवलेल्या अंगणात बाळकृष्णासारखा दिसतोय...

शेजी घाले सडा, मन्हा सड्याला भिडूनी
नादान हरी मन्हा, आला रांगोळी मोडोनी


शेजारीण माझ्या सड्याला जोडुन सडा टाकतेय! मोठमोठे सडा टाकायचं किती ते कौतुक.... पण माझ्या नादान हरीने रांगोळी मोडली की!

पह्यले गाऊ ओवी गं रामराया सजनाला
गाडीवर जाती, घुंगरु त्याच्या इंजनाला


पहिली ओवी गाऊ माझ्या धन्याची.. .. त्यांच्या गाडीच्या इंजनाला घुंगरु बांधलेत याचं कोण कौतुक!!

पारोळ झालं जुनं, नाशिक जमाबंदी
कोनी हौसानं बांधिली, आरधी मुंबै पान्यामंदी


त्याकाळात आपल्या गावापेक्षा मोठं, स्वप्ननगरीसारखं शहर म्हणजे मुंबई आणि मुंबै बघणे म्हणजे जीवाची मुंबई करणे हे गावातल्या कित्येकांचं स्वप्न असायचं! धुळ्याजवळ असणारं पारोळा ही आता जुनं झालं इतकच काय नाशिक ही आता नको... ! पण मुंबई हे बेट होतं हे ही ह्या सासुरवाशिणीला माहितीये. म्हणुन ती म्हणतेय कोणी हौसेनं ही मुंबई अर्धी पाण्यात बांधलीय.

काय पुण्य केलं तुम्ही नाशिकच्या बाया
गंगेची आंघोळ, दर्शनाला रामराया


त्याकाळी, पिकनीक, ट्रीपा/ टुर असं काही नाहीच. तीर्थक्षेत्री जाऊन थोडंफार स्थलदर्शन व्हायच. इतकच. नाशिकच्या बायकांनी असं कोणतं पुण्य केलय की त्यांना रोज गंगेची(गोदावरी) आंघोळ आणि रामरायाचं दर्शन होतं. इथे आम्हाला वर्षातुन एकदा ही कोणी तीर्थक्षेत्री नेत नाही....

काय पुण्य केल तुमी, नाशिकचे लोक
गंगेची आंघोळ, दर्शनाला गायमुख


नाशिकच्या लोकांचं ही पुण्य महान की त्यांना रोज गोमुखाचं दर्शन होतं!

रामकुंडावरी ढवळ्या धोतराची जोडी
आंघोळीला येती रामलक्ष्मणाची जोडी

रामकुंडावरी ओल्या धोतराचा पिळा
आंघोळीला येती साधुसंताचा मेळा

आरध्या रात्री कोण चालला एवढ्या राती
महादेव पार्वती हा कंदील डाव्या हाती


मध्यरात्री १२ वाजले की शिव-पार्वतीचा फेरा येतो म्हणतात... आणि तेव्हा त्यांना जिथे दु:ख दिसेल तिथे ते दूर करतात असं म्हणतात.

देवा रे महादेवा, काय बसला डोया लाई
पृथमी ( पृथ्वी) ढुंढल्यानी जोडी मारुतीला न्हाई


अरे महादेवा, भोळ्या शंकरा असा डोळे मिटुन काय बसलायस? आख्ख्या पृथ्वीवर मारुतीला जोडी नाही काय?

भोळा रे शंकर, भोळं तुझं घेण देण
तुझ्या बेलामधे मला सापडल सोनं

राम-लक्ष्मण नि ही तिसरी सिताबाई
पृथमीमधे जोडा मारुतिला न्हाई


राम सितामाई ही कुटुंबवत्सल जोडी! जिथे रामाने एकीकडे भावाला (लक्ष्मणाला) ही बरोबर ठेवले एकीकडे पत्नीलाही तेवढाच दर्जा दिला. पण आख्ख्या पृथ्वीवर बिचार्‍या मारुतीला जोडी सापडली नाही. तो ब्रम्हचारीच राहिला.

सिता सांगे कथा तिन्ह्या करमनी (कर्माची)
राम सांगे कथा देवधरमनी (देवधर्माची)

सिता तिच्या कर्माची कथा सांगते तर राम धर्म न्याय अशा गोष्टी करतो. सिता तिच्या दुर्दैवाला कोसतेय तर राम तिला पितृवचनपालन वै. धर्म शिकवतो.

शितेला सासरवास रामाच्या मावशीचा
असा वाळुन गेला हिरवा बाग तुळशीचा

रामाने तर वनवास भोगला...पण खरा उन्हाळा सोसला सितेने. एकीकडे कैकयीचा सासुरवास नंतर रामाबरोबर वनवास आणि लंकेत गेल्यावर विजनवास! तिच्या दु:खाने हिरवागार तुळशीची बाग ही वाळुन गेलीय.

सितेला सासुरवास रामाला कसा कळे
रामाचे रामफळे रुमाले रस गळे

सितेला घडणा-या सासुरवासाने रामही बेचैन आहे इतका की रामफळातुन रुमालाने टिपुनही रस गळतोय.

सितेला सासरवास, सासू कैकयीने केला
रामासारखा भरतार हिने भोगु नाही दिला


सासु कैकयीने सितेला इतका सासुरवास केला की , रामासारख्या एकपत्निव्रत, एकनिष्ठ, पुरुषोत्तम अशा पतीबरोबर सुद्धा तिला संसारसुख भोगता आले नाही.

गरीब दुबळा (कसा ही असो) बंधु गं असावा
दिवाळी दसरा एका रातीचा इसावा

सासुरवाशिणीला आधार फक्त भावाचा असतो. म्हणुन इथे ती म्हणतेय की गरीब दुबळा कसाही असो भाऊ असावा.... दिवाळी दसरा या सणासुदीला माहेरी जायला मिळते....तेवढाच सासरच्या धबडग्यातुन एका रात्रीचा विसावा!

भाऊ बहिणीचं भांडण तिथ कशाचा रागरोस
भाऊला ओवाळायला, भाऊबिजेचा एक दिस

अरे भाऊराया, आपलं ते भांडण काय अळवावरचं पाणी. तिथ कशाला रागरोस ठेवायचा. भावाला ओवाळण्यासाठी भाऊबिजेचा असा एकच दिवस असतो.

शिंपीच्या दुकानी उच्च खणले मारु खडा
शिंपी भाऊ मोठा येडा, भाऊ बहिणीना सौदा मोडा

शिंप्याच्या दुकानात चोळीचा खण थोड्या जास्त किंमतीचा आहे. पण तो मूर्ख शिंपी त्याची किंमत अधिक सांगुन भाऊ बहिणीचा सौदा मोडतोय.

पापी रे मानसा, हा बसला बाजारात
लोकाची लेक बाया याने घेतली नजरात

बाजारात कसले कसले लोक येतात. त्यांच्या नजरा दुस-याच्या बायाबापड्यांवर फिरत असतात...अशाच एका नजरेची तिला दळण दळता दळता आठवण होते....आणि दुसरीला सावध करण्यासाठी ती तीला हे ओवीतुन सांगते.

माझ्या घरी गं पाहुणे करु आताचा दहीभात
भाऊ गं पाहुणा, बुंदी छाटु सारी रात

खान्देशातला रोजचा आहार म्हणजे भाजी भाकरी आणि रात्रीची तांदुळाची फोडणीची खिचडी. वरण भात वरुन साजुक तुप वगैरे अगदी सणासुदीलाच होणार...किंवा पाहुण्यांना! आज माझा भाऊ घरी पाहुणा म्हणुन आलाय. त्याच्यासाठी दहीभात तर करतेच पण गोडधोड म्हणुन आख्ख्या रातभर बुंदी छाटावी लागली तरी बेहतर.

झाली संध्याकाळ, संध्याकाळले मान देऊ
स्वर्गी गेले माझे पिता, दिवा लावुन पाणी पिऊ

सायसंध्याकाळी पितरांचा फेरा असतो म्हणुन दिवेलागणीला तुळशीजवळ दिवा लावल्याखेरीज काही खाउ-पिउ नये असं म्हणतात. मुलीवरच्या प्रेमाने आलेला स्वर्गस्थ पित्याचा आत्म्याला तेलाचा दिवा दाखवुन मान देतांना ही सासुरवाशीण असं म्हणते.

आली सही सांज, आला वांझोटीचा फेरा
सांगते सुनबाई, पदराखाली झाक हिरा

नेमकं सांजसमयी कुटाळक्या करणारी वांझोटी शेजी बाई गप्पा मारायला येउन बसते. तिची नजर तुझ्या हि-याला (लहानग्याला) लागु नये म्हणुन सासुबाई इथे सुनेला म्हणते की तुझ्या मुलाला पदराखाली झाकुन ठेव.

माझा भाऊ आला आज, माझा भाचा आला
लई गं दिस झाले, आत्या माहेराला चाल काल

आज मन किती उचंबळुन येतय! कारण माझा भाऊ, भाचा माझ्याकडे आलेत आणि भाचा आग्रह करतोय की किती दिवस झालेत आत्या चल ना गं आमच्या घरी! व्वा...कोणी आपल्या येण्याची वाट बघतय ही कल्पनाच किती रम्य आहे!!

उन्हाळ्याचं उन्ह, ऊन लागे कपाळाला
नादान बंधु माझा, छत्री साजे गोपाळाला

खान्देश म्हणजे कडक उन्हाळा! अशा उन्हाळ्यात उन्हातान्हात भाऊ मला भेटायला येतोय. छत्री घेउन येतांना भाऊ किती साजेसा दिसतोय.

सासु आत्याबाई, तुमच्या पदराला ववा(ओवा)
जाते माहेराला, माझ्या पतीला जीव लावा

पुर्वी नात्यातली लग्न म्हणजे भावाची मुलगी आत्याने सुन करुन घ्यायची असे व्यवहार होत. सासवांच्या पदराला सुपारी, ओवा असं काय काय बांधलेलं असे. भाऊ घ्यायला आलाय, माहेराला तर जायचय ...पण इकडे सासरही सोडवत नाही. धन्याची चिंता ...आता आई आपल्या मुलाची काळजी घेइलच! पण सासुरवाशीण तरीही माहेरी जातांना सासुला सांगुन जातेय की पतीला जीव लावा...त्यांच्या खाण्यापिण्याची हेळसांड करु नका.

शिता भावजाई, तुझा गं मला राग येतो
चतुर भाऊ माझा हाताने पाणी घेतो

माहेरी आल्यावर एकेक चित्र उलगडत जातय. सिता भावजाईचा तोरा इतका की भाऊही तिच्या ताटाखालचं मांजर बनलाय. म्हणुन इथं ती म्हणते की तुझा राग येतो कारण इतका माझा हुशार, चतुर भाऊ ...पण आज अशी वेळ आलीये की त्याला स्वतः हाताने पाणी घ्यावं लागतय.

वडील माझा लेक देर जेठच्या बरोबरी
पुसती जन लोक कुठे गेले हो कारभारी

माझा मोठा मुलगा दीर-जेठाच्या बरोबरीला आलाय... तरी दुरदेशीला गेलेला धनी अजुन परतला नाही. आजबाजुचे लोक आडुन आडुन चौकशी करतात की कारभारी कुठे गेलेत?


गावातल्या गावात भाऊ बहिणीशी बोलेना
आस्तोरी(बायको)च्या पुढे त्याचा विलाज चालेना

कधी कधी बहिण-भावांचे खटके उडतात. म्हणुन बहिण खंत व्यक्त करतेय की गावातल्या गावात दिलय तरी भाऊ बोलत नाही...त्याच्या अस्तुरी(बायको)पुढे काही इलाज चालत नाही.

गावातल्या गावात साला बहिणोईचं नातं
भाऊ कसा म्हणे नित्य होतो रामराम

बहिणीला गावातच दिलय....लहान गाव असल्याने नित्य कुठे ना कुठे पाव्हण्याचं (मेव्हणा) दर्शन होतच.

भाऊ गं आपला, भावजाई गं लोकाची
तिच्या गं पोटची, भाची गं आपल्या गोताची


फुरंगटुन ही सासुरवाशीण म्हणते, भाऊ शेवटी आपला ...आपलं नातं रक्ताचं पण भावजाई शेवटी लोकाची पोर. हो, पण तिच्याच पोटची भाची ही आपल्या गोताची म्हणजे तिच्याही अंगात भावाचं पर्यायाने आपलंच रक्त खेळतय.

सांगस भाऊ तुले भेटी जाय उन्हाळ्यात
पानीपाऊसना माले, चार महिना धाक

भावाला सुचवलं जातय की दर उन्हाळ्यात भेट देऊन जा रे.... पावसाळ्याचे ४ महिने नदी-नाल्यांना/ओढ्यांना पाणी असतं, बैलगाड्या पैलतीरी जाउ शकत नाही. म्हणजे या काळात आपली भेट होणं तसं मुश्किलच.

मामा गं भाच्याची झुंज लागली खिंडीत
पुसती जनलोक मायलेकीचा पंडीत

मामा-भाचे...एक मायेचा पंडीत एक लेकीचा पंडीत.खिंडीत झुंजतायत...लुटुपुटुची लढाई! यात हरणार कोण जिंकणार कोण हे थोडच महत्वाचं! मामा भाच्याला ट्रेन्ड करतोय हे काय कमीये का?

नणंद भावजाया आम्ही एका चालणीच्या
बाहेर गं निघाल्या सुना कोण मालणीच्या

आम्ही नणंद भावजाया नटुन थटुन बाहेर निघाल्या की लोकही पुसतात की या सुना कोणाच्या?

देराण्या जेठाण्या आपण काळ्या साड्या नेसु
बाहेर गं निघु सुना वकीलाच्या दिसु

वकील, बॅरीस्टर, डॉक्टर आणि शिक्षक हे तसे त्याकाळातले मानमरातब प्राप्त पेशे. आम्ही जावा-जावा जेव्हा काळ्या साड्या नेसुन बाहेर निघु तर अगदी जशा वकिलाच्या सुना!

दिवाळीच्या दिवशी माझ्या ताटातले गहू
असे ओवाळीले पाची पांडव माझे भाऊ

मोठ्या दिमाखाने ही सासुरवाशिण म्हणतेय दिवाळीच्या दिवशी माहेरी आल्यावर माझ्या पाच पांडवांसारख्या भावांना असे ओवाळीले आणि भरभरुन आशिर्वाद दिले ( भाऊ नेहमी बहिणीचा नमस्कार करतात, पण बहिण कधी भावांचा नमस्कार करत नसते एवढच काय भाच्यांनीही कधी मामाचा नमस्कार करायचा नसतो...अशी मानता होती)

दिवाळीच्या दिवशी माझ्या ताटामधे मिरे
असे ओवाळीले मायबाई तुझे हिरे

मायेला/आईलाही सांगुन ठेवते की दिवाळीच्या दिवशी तुझ्या ह्या हि-यांना मी ओवाळलेय.

माय माय करु , माय तांबानी परात
मायवाचुनि चित्त लागेना घरात

पण मधेच का आईच्या आठवणीने मन सैरभैर होतय? मुल कितीही मोठं झालं तरी आई घरात नसली की केविलवाणं होतं. म्हणुनच म्हणतात ना :
"आई म्हणजे एक नाव असतं
घरातल्या घरात एक गाव असतं"
बघा ना इथे तर ही सासुरवाशीण सासरी रमलेली आहे, एका मुलाची आई आहे तरी माहेरी आल्यावर आई दिसली नाही की कावरी बावरी होते.

मायेने दिल्या घुट्या जायफळ-एखंडाच्या
काम करी करी माझ्या दंड-बाह्या लोखंडाच्या

आपल्या आईचं कौतुक करतांना ही अभिमानानं सांगतेय की आईने लहानपणी जायफळ-वेखंडाच्या बाळघुट्या दिल्या म्हणुन आज मला कितीही काम पडु दे त्याची चिंता नाही. काम करकरुन माझे दंड लोखंडासारखे झालेत.

काम करती नारी, तुले काम करी जाऊ
माऊलीनं दूध, मी हारले ना जाऊ

पुर्वीच्या काळी स्त्रियांना दळण, कांडणं, सडा-सारवणं, धुणी-भांडी एवढी कष्टाची कामं करुन पुन्हा शेतावरही जावं लागे. इथे ही स्त्री म्हणतेय कितीही काम पडो.... मी हरणार नाही. माझ्या आईच्या दुधाचा अपमान मी होऊ देणार नाही.

भाऊ करु याही, बाप म्हने नको बाई
आताना भावजाया मान ठेवणार नाही

भावाला व्याही करायचय पण इकडे बाबा म्हणतात की नको ग बये, आताच्या भावजया मान ठेवत नाही. मुलगी दिली तरी ती कमीपणा घेणार नाहीच्...उलट भावजयीचच नाक वर राहील.

जाउ माहेराले, उभी राहु एकीकडे
भाचाले लेऊ कडे, भावजाई पाया पडे

भारतीय संस्कृतीत 'अतिथी देवो भव' असलं तरी ते तेवढचं मर्यादीत आहे. 'चार दिवसांचा पाहुणा..' असं गावाकडे म्हणतात....४ दिवसांच्या वर पाहुणे राहिले तर तो पाहुणा रहात नाही म्हणजे त्याचं तसं आदरातिथ्य ठेवलं जात नाही.सासरहुन माहेरी गेलेली मुलगी एकाकी एकीकडे उभी रहाते पण भाच्याला कडेवर घेतलं की भावजईची स्वारी खुश...मग हसत हसत ती पाय पडायला येते.

भाऊ करी याही, माले भाचीसून सोभे
तोडा पैंजनानं मन्ह तळघर वाजे

भावजाई आपली नाही तरी भाची माझी गुणाची. भावाला व्याही करुन भाचीला सून केलं तर तिच्या पैंजणांच्या मधुर आवाजानं माझं सगळं घर भरुन जाईन.

भाऊ करु याही माले पैसानी जोखम
भाची करु सून पोरी चांदीनी रकम

लखोपती भावाच्या नक्षत्रासारख्या मुलीला सुन करुन घेतलं तर तिच्या पावलांनी घरात भरभराट येइल.

गाडीमागे गाडी, एक गाडी आरशाची
भाऊले झाया लेक, चिठ्ठी आली बारशाची

दारात गाडीमागे गाडी कोणाची आलीये? हं, आरशाची गाडी म्हणजे भावाचीच. भावाला लेक झालाय त्याच्या बारशाचे आमंत्रण द्यायला भाऊ स्वतः आलाय.

नादान मनू मन्ही, तुन्हा परकराले मोती
धुळ्यात नांदती, मामा तुझे लखोपती

माझी निरागस मुलगी तिच्या परकर पोलक्याला मोती जडलेले आहेत. ऐकलस का गं धुळ्यात रहाणारे तुझे मामा लखोपती आहे म्हणुन ही हौस बरं! भावाचं कोण कौतुक!

देव रे मारुति, हा पानीना सगरले
कशी पडु पाय, दोन्ही हात घागरले

सकाळी नदीवर पाणी भरायला गेले तर वाटेतल्या मारुतिला नमस्कार करत येत नाही याची केवढी खंत वाटतेय! डोक्यावर एकावर एक २ घागरी, कमरेवर एक घागर आणि दुस-या हातात एक अशा परिस्थितीत असल्यावर मारुतिला नमस्कार करु कशी?

राम-लक्ष्मण ही तिसरी सितामाई
रामाच्या पुढे चाले हा मारुति ब्रम्हचारी


गायनं गोमतीर माझ्या अंगणी बाह्यरेला
दूर नि ओळखला माझ्या भाऊचा हिरवा शेला


गायीचं गोमुत्र गोठ्यातुन अंगणात वहातय. हा लांबुन येणारा हिरवा शेला घातलेला माणुस म्हणजे नक्की माझा भाऊच.

भाऊ जाते बहिणीच्या गाई, घोडा बांधतो जाळीला
पह्यले भेट पाव्हण्याला, मग भेटजो बहिणीला

बहिणीच्या सासरी गेलेला भाऊ आपला घोडा जाळीला बांधतो. बहिण त्याला हळुच खुणावतेय की आधी पाव्हण्याला (मेव्हण्याला) सासु सास-यांना भेटुन मगच मला भेटायला ये.
बहिणीच्या सासरी सगळ्यांचाच मान ठेवावा लागतो... नाहीतर नंतर बहिणीला टोचणुक होते. एवढ्च काय भेटायला गेलं तरी आधी मेव्हण्याची, तिच्या सासु-सास-यांची विचारपुस करावी लागते. नंतरच बहिणीला भेटता येतं.

लिंबाच्या लिंबोळ्या लिंबाखाली पसरल्या
पोटी आल्या लेकी, बहिणी भाची इसरल्या

हा थोडा तिरकस शेरा भाऊ-भावजईला की तुमच्या पोटी लेकी आल्या तर तुम्ही बहिणी भाच्यांना पण विसरलेत? पुर्वीसारखी हौसमौज होत नाही माहेरी आल्यावर.

कोण्या गाई(गावी) गेला, माझ्या पाठीचा रंगेला
असा सुना लागे, तुन्हा बैठकी बंगला

भावजईला उद्देशुन ही म्हणतेय की शेवटी घरधन्याशिवाय घराला शोभा नाही...तुझा हा बैठकी बंगला तुलाच लखलाभ होवो. माझ्या पाठचा भाऊ लांबच्या अशा कुठल्या गावाला गेलाय की त्याच्याशिवाय हा बंगला ही सुना सुना वाटतोय.

सोनाराच्या मुला, नको जाऊ देशोदेशी
हाती घेतली सांडशी, आता होतील गणपती

सोनारी कामात सांडशी किंवा पकड हा एक महत्वाचा भाग आहे. हाती घेतली सांडशी- आताच काम आलय.. हातात सांडशी घेतलीय...आणी गणपती झाले की दिवाळी दसरा म्हणजे आपली सुगी./कामं चालु होतात ...मग दुरदेशी जाण्याची का हौस तुला?

सईबहीना जोडु, माझ्या सारखी रंगिली
सगळ्यात चमकली, हुभ्या खांबाची बिजली

माझ्या मैत्रीणी माझ्यासारख्याच हौशी आहेत. लाखात एक अशी माझी सईबाई उठुन दिसते.

सईबहिना जोडु, मुसलमाननी सारजा
कपाळना कुंकू तिन्हा रामनी वरजा

खान्देश- मुसलमानी राजवटीमुळे त्यावेळच्या परिस्थितींच दर्शन अशा ओव्यातुन होतं ! खानांचं राज्य होतं ...पण हिंदु-मुस्लीम तेव्हा गुण्यागोविंदाने रहात होते. ब्रिटीशांनी नंतर यात फुट पाडली. शेजारी रहाणारी मुस्लीम सारजा हिसुद्धा माझी सईबहिणच.... तिच्या देवांनी तिला कपाळाचं कुंकू वर्ज्य सांगितलय म्हणुन काय झालं!

पंढरीच्या वाटे, कोणी लावली सुपारी
खरेदी करे हा पंढरीचा बेपारी(व्यापारी)


सरीले दळण, माझी सरती स्वस्तकी
तलवारीचा मार, हेल्याच्या मस्तकी

* हेला: रेडा. पुर्वी हेला म्हणजे रेडा याचा बळी द्यायची पद्धत होती. त्याचा संदर्भ इथे आहे.

सरीले दळण, माझी सरती आईका(ऐका)
माझ्या संगतीला, नामदेवाच्या बायका

दळण संपत आले, आता माझी शेवटची ओवी ऐका! आज अशा एकावर एक इतक्या सुंदर ओव्या सुचल्या की जणु काय माझ्या संगतीला संत नामदेवांच्या घरच्या बायका होत्या.

सौजन्यः माझी आत्या- कै.विमलबाई दुसाने, धुळे
काकु- प्रमिला वानखेडे, धुळे
आई- विजया वानखेडे, पुणे              

Friday 22 April 2011

खानदेशी पाककृती: बाजरीची खिचडी/ ढासले

लागणारा वेळ: 
२० मिनिटे
 
लागणारे जिन्नस: 
बाजरी : एक किलो
तांदुळः अर्धी वाटी
तुरीची दाळः अर्धी वाटी
गुळ, साजुक तुप, मीठ नेहमीप्रमाणे

तिखट करायची असल्यासः फोडणीसाठी १-२ मध्यम आकाराचे कांदे चिरुन, ओले वाटाणे, शेंगदाणे, लसुण, हिंग, चवीप्रमाणे लाल तिखट, मीठ आणि थोडासा गरम मसाला
क्रमवार पाककृती: 
ढासले : म्हणजे बाजरीची खिचडी म्हणा हवे तर.
७-८ माणसांसाठी एक किलो बाजरी धुवुन निथरुन ठेवावी...थोडीशी सुकल्यावर ओलसर असतांनाच कांडावी. पाखडावी म्हणजे टरफले निघुन जातात. नंतर चाळणीने चाळुन घ्यावी ..म्हणजे पीठ, कोंडा काढता येतो. आता ही बाजरी त्यात अर्धी अर्धी वाटी तांदुळ ( खिचडीचा) आणि दाळ (तुरीची किंवा हरभ-याची) घालुन मीठ, किंचीतशी हळद , हिंग घालुन कुकरमधुन २-३ शिट्ट्या करुन काढावी. खिचडीला पाणी जास्त लागते कारण बाजरी आणी तुरीची दाळ! गरमागरम खिचडीवर गुळ, तुप घालुन खातात.
थंडीच्या दिवसात उत्तम.
हीच खिचडी आम्ही तिखट करतो. कांदा, लसुन, हळद, हिंग,लाल तिखट, शेंगदाणे, (ओले वाटाणे ही घालतात)घालुन फोडणी करुन घ्यावी. त्यात पाणी ओतुन वर सांगितल्या प्रमाणे पाखडलेली बाजरी, तांदुळ, तुरीची दाळ धुउन टाकावे. ही खिचडी शिजत असतांनाच असला खमंग वास पसरतो कि यंव!!! स्मित खिचडी शिजली की वरुन चिरलेली कोथिंबिर पसरावी.
वाढणी/प्रमाण: 
७-८ जणांसाठी
अधिक टिपा: 
खान्देशी माणुस आणि खिचडीच वेगळच नातं आहे. खिचडी आणी वर तेलाचीच(शेंगदाणा/गोडेतेल) धार...कसली सर नाही त्याला. आणि हो, तेल कच्चेच असावे...
मग त्याबरोबर कैरीचेच लोणचे, पापड, हा सरंजाम असला किंवा नसला तरी चालते.
माहितीचा स्रोत: 
आई

Thursday 21 April 2011

मी ते घागर धरी धरी नाचु वं माय !

आंग्या पांग्या ना संसार नही कराव माय
मी ते घागर धरी धरी नाचु वं माय !

मी ते शेतकरी नवरा नई कराव माय
यान्हा पायल्या ना भाकरी कोन करी माय
मी ते घागर धरी धरी....!

मी तं पोलीस भरतार नइ कराव माय
यान्हा पट्टानी पालीस ( पॉलिश) कोन कराव माय
मी ते घागर धरी धरी....!

मी तं मास्तर भरतार नही कराव माय
यान्हा पगारना नोटा कोन मोजी माय
मी ते घागर धरी धरी...!

मी तं साह्येब भरतार करसु वं माय
त्यान्हा गयामां हात घाली फिरसु वं माय
मी ते घागर धरी धरी नाचु वं माय!

Tuesday 19 April 2011

कोन गाव परनाले जाशी वं मना रसिक राजा

कोन गाव परनाले जाशी वं मना रसिक राजा
कोन गाव परनाले जाशी वं मन्हा रसिक राजा ||
काय बांधी उना वं मन्हा रसिक राजा
घड्याळ बांधी उना वं मन्हा रसिक राजा
कस्सानं घड्याळ न कस्सानं काय
डेडोर ( बेडुक??) बांधी उना वं मन्हा रसिक राजा ||
कोन गाव परनाले जाशी वं मना रसिक राजा....

काय बांधी उना व मन्हा रसिक राजा
पोयतं बांधी उना वं मन्हा रसिक राजा
कस्सा न पोयत न कस्स न काय
नाडा बांधी उना वं मन्हा रसिक राजा ||
कोन गाव परनाले जाशी व मन्हा रसिक राजा...

काय बांधी उना वं मन्हा रसिक राजा
बाशिंग बांधी उना वं मन्हा रसिक राजा
कस्सा न बाशिंग नि कस्सा न काय
सुपडं बांधी उना व मना रसिक राजा ||
कोन गाव परनाले जाशी व मना रसिक राजा

गड पर से आयी मेरी मां, मां ने वन्दन करो

गड पर से आयी मेरी मां, मां ने वन्दन करो
गड पर से आयी मेरी मां, मां ने वन्दन करो

सुतार दिर मन्हा आओ, मां ने बाजट लाओ
सुतार दिर मन्हा आओ, मां ने बाजट लाओ
बाजट पर बैठी मेरी मां, मां ने वन्दन करो
गड पर से आयी मेरी मां, मां ने वन्दन करो

सोनार दिर मन्हा आओ, मां ने कमरपट्टा लाओ
कमरपट्टा पहनी मेरी मां, मां ने वन्दन करो
गड पर से आयी मेरी मां, मां ने वन्दन करो

दर्जी दिर मन्हा आओ, मां ने चोली सिलावो
चोली को पहनी मेरी मां, मां ने वन्दन करो
गड पर से आयी मेरी मां, मां ने वन्दन करो

कासार दिर मन्हा आओ, मां ने कन्गन लाओ
कन्गन को पहनी मेरी मां, मां ने वन्दन करो
गड पर से आयी मेरी मां, मां ने वन्दन करो

सज धज के बैठी मेरी मां, मां का रुप निहारु
सजधज के बैठी मेरी मां, मां का रुप निहारु
गड पर से आयी मेरी मां, मां ने वन्दन करो

पहिलं नमन खान्देश कवियित्री बहिणाबाई चौधरी यांना

अरे संसार संसार, जसा तवा चुल्यावर
आधी हाताला चटके, तवा मिळते भाकर

अरे संसार संसार, खोटा कधी म्हणू नये
राऊळाच्या कळसाला, लोटा कधी म्हणू नये

अरे संसार संसार, नाही रडणं, कुढणं
येडया गळयातला हार, म्हणू नको रे लोढणं

अरे संसार संसार, दोन जीवांचा विचार
देत सुखाला नकार, आणि दुखाःला होकार

अरे संसार संसार, खिरा येलावरला तोड
येक तोंडामधे कडु, बाकी अवघा लागे गोड

अरे संसार संसार, म्हनु नको रे भिलावा
त्याले गोड भीमफुलं, मधी गोडंब्याचा ठेवा

देख संसार संसार, शेंग वरतुन काटे
अरे वरतुन काटे, मधे चिक्ने सागरगोटे

देखा संसार संसार, दोन्ही जीवांचा सुधार
कधी नगद उधार, सुखादु:खाचा बेपार

अरे संसार संसार, असा मोठा जादुगार
माज्या जीवाचा मंतर, त्याच्यावरती मदार

असा संसार संसार, आधी देवाचा ईसार
माज्या दैवाचा जोजार, मग जीवाचा आधार

-कवयित्री बहिणाबाई चौधरी