थोडं इतिहासात डोकावुया:
असं म्हणतात की विंध्याचल पर्वत ओलांडुन दक्षिणेत गोदातीरी वास्तव्य करणारे 'अगस्त्य/अगस्ती' ऋषी हे पहिले आर्य. प्राचीन काळी खान्देशाचे नाव 'रसिक' होते.

त्या काळात सम्राट अशोकाच्या अंमलाखाली हा प्रदेश होता. त्यांच्यानंतर 'संगा' घराण्यातील 'पुष्यमित्र' याने मौर्यांना इथुन दूर करुन राज्य केले. त्याच्याही नंतर सातवाहन राजांनी हा प्रदेश काबिज केला.

इ.स. २५० मधे अभिर/ अहिर राजांनी आक्रमण करुन सातवाहनांना दुर केले आणि इथे अनेक वर्ष राज्य केले. इ.स. ३१६- ३६७ या काळात इथे महाराजा रुद्रदास, महाराजा स्वामीदास, महाराजा भुलुंडा ह्या अहिर राज्यांनी राज्य केले. हे अहिर राजे उत्तर हिंदुस्थानातुन इकडे आले. पशुपालन /शेती हा जरी त्यांचा व्यवसाय होता तरी ते लढवय्ये होते. त्यांची भाषा अहिरवाणी किंवा अहिराणी ही खान्देशातली भाषा आहे. खर तर खान्देश परगण्याला तीन जिल्ह्यांच्या परिसिमा लाभलेल्या आहेत. महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि गुजरात. तिन्ही राज्यांच्या भाषा मिळुन अशी अहिराणी भाषा बनलेली आहे.

काही काळ यादव कुळातील सेउनचंद्र राजाने इथे राज्य केले त्याच्या नावावरुन 'सेउनदेश' असे नाव पडले. नंतर गुजरातेतील फारुकी राजे अहमद१ या खानांच्या नावावरुन 'खान्देश' असे नाव झाले. सातवाहनांनंतर वाकाटक, राष्ट्रकुट, चालुक्य राजांकडुन हा प्रदेश १३व्या शतकापर्यंत देवगिरीच्या यादवांकडे आला. अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणानंतर १२९४ मधे हा प्रदेश त्याच्या ताब्यात गेला होता. १३७० पर्यंत खिलजीने राज्य केले. त्याच काळात थाळनेर आणि करवंदी सुभा सुलतान फिरोज तुघलक याच्याकडुन मलिक राजा फारुकी ला दान देण्यात आला. त्याच्या काळात देवपुर आणि जुने धुळे येथे गढी बांधण्यात आली. दुर्दैवाने १८७२ च्या पांझरेच्या पुरात देवपुरातली गढी वाहुन गेली. धुळ्याजवळच्या लळिंग किल्ल्यावरुन सुलतान फारुकीने इ.स. १६०० पर्यंत धुळ्यावर अंमल गाजवला. इ.स. १६२९ मधे हा प्रदेश मुघलांच्या साम्राज्यात गेला. इ.स. १८०३ मधे पडलेल्या भयंकर दुष्काळामुळे अनेक लोक गाव सोडुन निघुन जाउ लागले तेव्हा, विठ्ठल नरसिंग विंचुरकरांचा सहकारी बाळाजी बळवंत याच्या प्रयत्नाने पुन्हा हे गाव वसले.
१८१८ मधे हा परगणा इंग्रजांच्या ताब्यात गेला. ब्रिटिशांचा सनदी अधिकारी कॅप्टन ब्रिग याने हा विभाग चालवायला घेतला. असं म्हणतात की धुळे शहराची विशिष्ट रचना कॅप्टन ब्रिग यांच्या प्रयत्नातुन साकारली आहे. शहरातुन जाणारा एकच मुख्य रस्ता आणि त्याला काटकोनात जोडणा-या गल्ल्या/ रस्ते ही ती विशेष रचना.

१५ ऑगस्ट १९०० मधे धुळे- चाळीसगाव रेल्वे सुरु झाली. स्वातंत्र्योत्तर काळात १९६० मधे धुळे जिल्हा महाराष्ट्र राज्याला अधिकृतरित्या जोडला गेला.

१ जुलै १९९८ साली धुळे जिल्हा विभागुन 'धुळे' व 'नंदुरबार' असे दोन जिल्हे तयार करण्यात आले.

Thursday 22 August 2013

हाई ल्या आखो कानबाईनी गानी!


हाई ल्या आखो कानबाईनी गानी!
१५ दिवसांपुर्वी भावाकडे कानबाई झाली.
नविन काही गाणी मिळालीत जुन्या बायकांकडुन. :)

१) घरधनीनी मंडप सवारा, कथाईन जाशी मन्ही कानबाई माय
गावना मारुतीनी शिवार रोखी, कथाईन जाशी मन्ही कानबाई माय
गावना मारुतीले शेंदुर नारय, कथाईन जाशी...
गावना पाटीलने दरजा (दरवाजा) रोखा, कथाईन...
गावना पाटीलले पान सुपारी, कथाईन जाशी...
घरधनीनी मंडप संवारा, कथाईन जाशी...
घरधनीना जयजयकार, तठेच राहसु वं माय!

२) हाऊ काय सरावन महीना वं माय
पान वार्‍यानं उडेल वं माय
आईच्या दरबारी पडेल वं माय
आईने शेल्याने झाकीले वं माय
आईचा सासरा दशरथ वं माय, सासरा दशरथ
आईनी सासु केगामती (कैकयी) वं माय
आईना राम भरतार वं माय, राम भरतार


३) सुर्या निंघना, कानडी (कानबाई) उभ्या, दारावरी
तापी गोमीना(गोमती नदी) मेळ देव चांग्यावरी
सुर्या निंघना...
डोकी तांबन्या घागरी भेट गंगेवरी

४) कानबाई सांगे रानबाईने
थारा कोठे लेशी वं माय
थारा लेसु वारा लेसु
... भाईना घर वं माय
... भाईनं सुर्यामुखी दार
याने बसनं ठाकं दारी वं माय
ठाकं दारी याने मंडप दिला भारी वं माय

५) सहा महिन्याची रात्र गेली, गेले होते कुठे गं
वाणियाच्या दुकानी मी बसलो होतो तिथे गं
नारळाच्या गोणी मी तो खरेदी केल्या दोन्ही गं
सहा महिन्याची रात्र...
वाणियाच्या दुकानी मी...
खारकाच्या गोणी मी तं खरेदी केल्या दोन्ही गं
सहा महिन्याची रात्र गेली...
वाणीयाच्या दुकानी मी.....
लिंबोळ्याच्या गोणी मी तं खरेदी केल्या दोन्ही गं