थोडं इतिहासात डोकावुया:
असं म्हणतात की विंध्याचल पर्वत ओलांडुन दक्षिणेत गोदातीरी वास्तव्य करणारे 'अगस्त्य/अगस्ती' ऋषी हे पहिले आर्य. प्राचीन काळी खान्देशाचे नाव 'रसिक' होते.

त्या काळात सम्राट अशोकाच्या अंमलाखाली हा प्रदेश होता. त्यांच्यानंतर 'संगा' घराण्यातील 'पुष्यमित्र' याने मौर्यांना इथुन दूर करुन राज्य केले. त्याच्याही नंतर सातवाहन राजांनी हा प्रदेश काबिज केला.

इ.स. २५० मधे अभिर/ अहिर राजांनी आक्रमण करुन सातवाहनांना दुर केले आणि इथे अनेक वर्ष राज्य केले. इ.स. ३१६- ३६७ या काळात इथे महाराजा रुद्रदास, महाराजा स्वामीदास, महाराजा भुलुंडा ह्या अहिर राज्यांनी राज्य केले. हे अहिर राजे उत्तर हिंदुस्थानातुन इकडे आले. पशुपालन /शेती हा जरी त्यांचा व्यवसाय होता तरी ते लढवय्ये होते. त्यांची भाषा अहिरवाणी किंवा अहिराणी ही खान्देशातली भाषा आहे. खर तर खान्देश परगण्याला तीन जिल्ह्यांच्या परिसिमा लाभलेल्या आहेत. महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि गुजरात. तिन्ही राज्यांच्या भाषा मिळुन अशी अहिराणी भाषा बनलेली आहे.

काही काळ यादव कुळातील सेउनचंद्र राजाने इथे राज्य केले त्याच्या नावावरुन 'सेउनदेश' असे नाव पडले. नंतर गुजरातेतील फारुकी राजे अहमद१ या खानांच्या नावावरुन 'खान्देश' असे नाव झाले. सातवाहनांनंतर वाकाटक, राष्ट्रकुट, चालुक्य राजांकडुन हा प्रदेश १३व्या शतकापर्यंत देवगिरीच्या यादवांकडे आला. अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणानंतर १२९४ मधे हा प्रदेश त्याच्या ताब्यात गेला होता. १३७० पर्यंत खिलजीने राज्य केले. त्याच काळात थाळनेर आणि करवंदी सुभा सुलतान फिरोज तुघलक याच्याकडुन मलिक राजा फारुकी ला दान देण्यात आला. त्याच्या काळात देवपुर आणि जुने धुळे येथे गढी बांधण्यात आली. दुर्दैवाने १८७२ च्या पांझरेच्या पुरात देवपुरातली गढी वाहुन गेली. धुळ्याजवळच्या लळिंग किल्ल्यावरुन सुलतान फारुकीने इ.स. १६०० पर्यंत धुळ्यावर अंमल गाजवला. इ.स. १६२९ मधे हा प्रदेश मुघलांच्या साम्राज्यात गेला. इ.स. १८०३ मधे पडलेल्या भयंकर दुष्काळामुळे अनेक लोक गाव सोडुन निघुन जाउ लागले तेव्हा, विठ्ठल नरसिंग विंचुरकरांचा सहकारी बाळाजी बळवंत याच्या प्रयत्नाने पुन्हा हे गाव वसले.
१८१८ मधे हा परगणा इंग्रजांच्या ताब्यात गेला. ब्रिटिशांचा सनदी अधिकारी कॅप्टन ब्रिग याने हा विभाग चालवायला घेतला. असं म्हणतात की धुळे शहराची विशिष्ट रचना कॅप्टन ब्रिग यांच्या प्रयत्नातुन साकारली आहे. शहरातुन जाणारा एकच मुख्य रस्ता आणि त्याला काटकोनात जोडणा-या गल्ल्या/ रस्ते ही ती विशेष रचना.

१५ ऑगस्ट १९०० मधे धुळे- चाळीसगाव रेल्वे सुरु झाली. स्वातंत्र्योत्तर काळात १९६० मधे धुळे जिल्हा महाराष्ट्र राज्याला अधिकृतरित्या जोडला गेला.

१ जुलै १९९८ साली धुळे जिल्हा विभागुन 'धुळे' व 'नंदुरबार' असे दोन जिल्हे तयार करण्यात आले.

Monday 15 October 2012

    धुळ्याचे आग्रारोडवरील राममंदीरः
 धुळ्यातील हे अतिशय जुने मंदीर. याची उभारणी १९०८ मधे झाली असे तिथले पुजारी सांगतात. गणपतीमधे धुळ्याला गेले तेव्हा आवर्जुन या मंदीराला भेट दिली. अगदी खरं सांगायचं म्हणजे माझ्या बाबांच्या खाणाखुणा जपण्यासाठी भेट दिली मंदीराला. या मंदीराबाबत बाबा आठवण सांगतात ती अशी.
 बाबा बी.ए. फायनल इयरला असावेत तेव्हा. बाबांना कुणीतरी मित्राने असच एक जुनं बुलबुल वाद्य आणुन दिलं. ते घरात आल्यापासुन बाबांचा अभ्यासावरचं लक्ष उडालच. मुळात हुशार असणारे आमचे बाबा, घरच्या परिस्थितीमुळे पिंगळे नावाच्या सद्गृहस्थांकडे पाणी भरायचे. चार मजले असलेल्या इमारतीत सर्वात खालच्या मजल्यावरुन हातात दोन लोखंडी पाण्याच्या बादल्या भरुन चवथ्या मजल्यावर असलेल्या या साहेबांकडे त्यांचा ड्रम  आणि इतर प्यायच्या पाण्याचे हंडे वगैरे भरुन देणं सोप्पं काम नव्हतं. पण पिंगळे साहेबांनी बाबांची शाळेची फी महिना ५ रु. भरायचं कबुल केल्यामुळे ते हे काम करत. तर बुलबुलमुळे अभ्यासावरचं लक्ष उडालं. परिणामी बाबा पहिल्यांदा नापास झाले.
नंतर चुक कळल्यावर बाबांनी झटुन अभ्यास करायचं ठरवलं. त्यासाठी कधी रस्त्यावरच्या दिव्याखाली  तर कधी या मंदीरात असलेल्या दोन वैशिष्ट्यपुर्ण मोठाल्या समयांच्या उजेडात अभ्यास केला. आणि रिजल्ट आला. बाबा, सहा जिल्ह्यांमधे पहिले आले होते. :)
इतकी वर्ष खुद्द धुळ्यात रहात असतांना कधी या मंदीरात जाण्याचा योग आला नाही. पण आता बाबा गेल्यावर हे पाहण्याची इच्छा तीव्र झाली. म्हणुन यावेळेस या मंदीराला अगदी आवर्जुन भेट दिली. आतमधे एक वृद्ध बाबा बसले होते(बहुतेक पुजारी असावेत). त्यांना विचारल्यावर त्यांनी सांगितलं 'त्या' समया साखळदंडांनी बांधल्या होत्या. तरी चोरीस गेल्या. मंदीरातील गाभार्याचं काम वैशिष्ट्यपुर्ण आणि अतिशय कलाकुसरीचं आहे. खालील वेबलिंकवर ते दिसेल.
http://commons.wikimedia.org/wiki/File:Sculptor_work_at_Shriram_temple_in_Dhule_city_-_2.JPG
http://commons.wikimedia.org/wiki/File:Sculptor_work_at_Shriram_temple_in_Dhule_city_-_1.JPG
http://commons.wikimedia.org/wiki/File:Sculptor_work_at_Shriram_temple_in_Dhule_city_-_4.JPG
http://commons.wikimedia.org/wiki/File:Sculptor_work_at_Shriram_temple_in_Dhule_city_-_5.JPG
http://commons.wikimedia.org/wiki/File:Sculptor_work_at_Shriram_temple_in_Dhule_city_-_7.JPG

Tuesday 8 May 2012

कैरीचे लोणचे (खान्देशी पद्धतीचे)

मंडळी, लोणच्याचा सिझन सुरु झाला आहे. खान्देशी पद्धतीच्या लोणच्याची चव चाखायचीय?
चला तर मग...
परवाच आईला सोबत घेउन लोणचे केले. आईच्या हातचे लोणचे आमच्या आख्ख्या फॅमिलीत प्रसिद्ध आहे. इथे पुण्यातही कॉलनीत, ओळखीच्यांकडे असे कुठुन कुठुन तिला बोलावणे असते लोणचं टाकण्यासाठी. एकदा तर बहिणीने नाशिकहुन फोन करुन ऑनलाईन लोणचे घातले होते. त्याची चवही अप्रतिम आली होती. स्मित
सगळी कृती आईचीच...मी फक्त हेल्पर.
एकाच गोष्टीबद्दल माफ करा लोक्स. लोणचं (ऑफीसातुन संध्याकाळी घरी गेल्यावर) रात्री टाकल्याने फोटो म्हणावे तितके चांगले आलेले नाहीत.

साहित्यः
कैर्‍या: १० किलो
मीठः दीड किलो
गोडेतेलः २किलो
ब्याडगी मिरची तिखटः अर्धा किलो
ब्याडगी मिरची आख्खी: पाव किलो किंवा अंदाजे
मोहरी दाळः ३ पाव
बडीशेपः अदपाव ( एक मध्यम वाटी भरुन)
मेथी: १५० ग्रॅ.
धणे: १५० ग्रॅ.
लोणच्याचा मसाला:
मीरे, लवंगा, दालचिनी, सूंठ पावडर - सर्व एक एक चमचा(पोह्यांचा)
हिंगः २ चमचे
वेलदोडे: १ चमचा
जायफळ (किसुन) : १ चमचा
क्रमवार पाककृती:
सर्वप्रथम कैर्‍या दोन दिवस पाण्यात भिजत ठेवाव्यात. नंतर व्यवस्थित कोरड्या पुसुन सुड्याने(कैरी फोडण्याची विळी) फोडी करुन घ्याव्यात. आतला गर इ. काढुन टाकुन कैरीच्या फोडीसुद्धा पुसुन घ्याव्यात.














नंतर फोटोत दाखवल्याप्रमाणे आणि प्रमाण दिल्याप्रमाणे लोणच्याच्या मसाल्याचे सगळे जिन्नस कढईत टाकावे.



गोडेतेल गरम करुन (कडकडीत पण उकळते नको) ते यात हळुहळु टाकावे...म्हणजे लाल तिखट खरपुस भाजले जाते आणी छान लाल रंग येतो शिवाय चवीतही फरक पडतो. ब्याडगी आख्खी मिरची तव्यावर थोड्या तेलावर भाजुन घ्यावी आणि यात कालवावी.
सर्व जिन्नस एकत्र करुन थोडा वेळ मुरु द्यावे. नंतर कैर्‍यांवर पसरवत जावे.

एका बाजुला लोणच्याची बरणी (चिनीमातीचीच घेणे सोयिस्कर), व्यवस्थित पुसुन घ्यावी आणि मगच त्यात लोणचे भरावे.
फोडींच्या वर तेल येइल इतके तेल असावे.
लागणारा वेळ: 
२ तास

टिप: लोणचं टिकण्यासाठी मीठ आणि बुडतं तेल आवश्यक आहे.

माहितीचा स्त्रोतः मातोश्री
 
 
 
 
 
 
आणि आता २ महिन्यांनी संपुर्णपणे मुरल्यावर हे लोणचं असं दिसतय. :)
 

 
 

Thursday 3 May 2012

डुबुकवड्यांची मसालेदार आमटी!















लागणारे जिन्नस: 

मसाल्यासाठी:
मिरे: ८-१०
लवंगा-५-६
दालचिनी- २-३
मसाला वेलदोडा_ ३
चक्रफुल- ४
लाल तिखट- २ मध्यम आकाराचे चमचे
गरम मसाला असल्यासः २ चमचे
सुके खोबरे: अर्धी वाटी
कांदे: मध्यम आकाराचे ३
लसुणः ८-१० पाकळ्या
आलं- बोटाच्या पेराएवढं
मीठः आवडेत तितकं
डुबुकवड्यांसाठी:
बेसनः एक मध्यम आकाराची वाटी भरुन
मीठः चवीपुरते
लाल तिखटः आवडत असल्यास १ छोटा चमचा
हळदः किंचित
ओवा: भजीच्या पीठात घालतो तशा
क्रमवार पाककृती: 
मसाल्याची आमटी:
कांदे चिरुन तव्यावर थोड्या तेलावर लालसर भाजुन घ्यावे किंवा तसाच कांदा गॅसवर भाजला तरी चालेल. सुकं खोबरं काप करुन तेही तव्यावर थोड्या तेलात लालसर भाजावे.
लवंग मिरे, दालचिनी, चक्रफुल, मसाला वेलदोडा सर्वच तव्यावर भाजुन घ्यावेत.
आणि आता हे सर्व लाल तिखट, घरचा तयार गरम मसाला असेल तर त्यासहीत मिक्सरमधुन बारीक करावेत.
कढईत तेल घेउन तेल तापले की छोटा चमचाभर बेसन तेलात टाकावे. आणि नंतर हा वाटलेला मसाला त्यात घालावा.मसाला तेलात चांगला परतुन घ्यावा. मसाल्याचा वास घरभर पसरला आणि मसाला उलथन्याला चिकटला नाही म्हण्जे मसाला चांगला परतला गेला असे समजावे. नंतर जरुरीपुरते पाणी घालावे. व ही आमटी एकीकडे उकळु द्यावी. आधी जोरात करुन एकदा उकळी फुटली की बारीक गॅसवर. म्हण्जे आमटीला तेल चांगले सुटते.

आता डुबुकवड्यांसाठी:
वाटीभर बेसन पाणी टाकुन आणि वरील जिन्नस टाकुन म्हणजे ओवा, मीठ, हवं असल्यास लाल तिखट, हळद, भजीच्या पीठासारखं किंवा त्याहीपेक्षा थोडसं घट्ट एकजीव कालवावं.
आणि ही आमटी चांगली उकळली की त्यात भजीसारखे थोडे थोडे सोडावे. नंतर आमटीत या डुबुकवड्यांना खाली वर करुन शिजु द्यावे. चमच्यात घेउन शिजले की नाही हे बघता येईल.
वरुन कोंथिंबीर बारीक चिरुन घालावी व पुन्हा एक उकळी घ्यावी. गॅस बंद करावा.
भात, चपातीबरोबर ही खाता येते.


टीपः डुबुकवड्यांची आमटी थंड झाली की घट्ट होत जाते. म्हणुन पाणी आधी थोडेसे जास्त घालुन भरपुर उकळु द्यावे

Wednesday 18 April 2012

गव्हाचा पौष्टीक चिवडा! (Gavacha Chivada)


याला कुठलाही बुटका गहु चालतो. कल्याण सोना, किंवा लोकवन चालत नाही. पण २१८९ चालेल.
स्वच्छ निवडलेले गहु: १ किलो
मीठः रुचेल तेवढे
पापडखारः मीठाच्या प्रमाणात
शेंगदाणे: मुठभर
कढीपत्ता
लसुणः तळणीसाठी: ७-८ पाकळ्या चिरुन
फोडणीसाठी: जीरं, मोहरी, हळद,
लाल तिखट/ हिरवी मिरची: आवडीप्रमाणे
क्रमवार पाककृती: 
प्रथम १ किलो स्वच्छ निवडलेला गहु एक रात्रभर भिजवावा.
दुसर्‍या दिवशी सकाळी, तो गहु उपसुन कुकरमधे पाण्यात ४-५ शिट्ट्या घेउन शिजवावा. यात काळजी एकच घ्यायचीये की गहु जास्त शिजवायचा नाही. फक्त त्याची तोंडं उलुन येइपर्यंत शिजवायचा आहे.
कुकर थंड झाला की गहु ३-४ वेळेस थंड पाण्यातुन काढावा म्हणजे एकेक दाणा मोकळा होईल. नंतर गव्हातील उरले सुरले पाणी काढुन टाकावे व त्याला आपल्याला रुचेल इतके मीठ व पापडखार चोळुन ठेवावा. नंतर हे गहु कपड्यावर पसरवुन कडक उन्हात वाळवावे.
पुर्ण वाळले की गहु असे दिसतात.

वाळवल्यावर कोरड्या केलेल्या स्वच्छ डब्यात भरुन ठेवावेत. हे असे वर्षभर राहु शकतात.
नंतर लागेल तेव्हा, थोडे थोडे काढुन कोरड्या कढईत (तेलात नाही) भाजुन घ्यावेत.

आख्खे शेंगदाणे थोडे लालसर तळुन घ्यावेत.
लसूण बारीक चिरुन तोही खरपुस तळुन घ्यावा.
हिरवी मिरची आवडत असली तर तीही बारीक चिरुन तळुन घ्यावी
यानंतर एका कढईत फोडणी साठी तेल ठेउन त्यात जीरं मोहरी, कढीपत्ता, थोडे हिंग, हळद, लाल तिखट टाकुन त्यात हे भाजलेले गहु परतुन घ्यावेत.
झाला गव्हाचा पौष्टीक आणि खुसखुशीत चिवडा तयार! स्मित
डबा भरुन करुन ठेवला तरी आठवड्याभरात फस्त होतो.
हा चिवडा लहान मुलांबरोबरच मोठ्यांनाही आवडतो.
खान्देशात पाहुण्यांना ज्वारीच्या हळद मीठ लावलेल्या लाह्यांबरोबर हा चिवडा खायला देतात.

Thursday 1 March 2012

अहिराणीतील खमंग संवाद!

अहिराणीतील खमंग संवादः
नुकतेच 'मराठी दिनानिमित्त' मायबोली या वेबसाईटने 'मराठी बोलु कवतुके' या सदरांतर्गत २-३ प्रसंग देवुन त्यावरील आपापल्या बोलीभाषेतील संवाद मागवले होते.

 प्रसंग असा आहे:
आज घरात लग्नकार्य आहे. सगळी पाहुणेमंडळी एकत्रित आलेली आहेत. वधूकडची सगळी मानापानाची मंडळी जमली आहेत. आहेर, मेंदी, हळद लावणे, उखाणे, पंगती, रुसवेफुगवे सगळे छोटे छोटे कार्यक्रम बघावयास मिळत आहेत. अगदी लगीनघाई चालली आहे.

त्यातली ही माझी एन्ट्री:

नवरीनी फुई(आत्याबाई): वं बहिनीओन! आटपा! नवरी तय्यार व्हयनी का? आणि ती रत्नी? तिले जास्त टाईम लागस नट्टापट्टाले! काम नैन धाम नै... नुसता नखराच दखा नटमोगरीना!

मोठी जाऊ(नवरीना 'माय'ले): का वं इजु? नवरदेवले ववाळाले ताट लिधं का? त्या मां तुपना दिव्वा लावाले इसरु नकोस बर्का! आन आक्पेटी नेमबंद ठी दे नैतं इसरी जाशी...अन मग तथा बोंब! तुले म्हाईत शे ना 'धल्ला' (धडला- म्हातारा) ना स्वभाव! आन जवाईले ववाळशी तव्हय डोक्यावर पदर घे जो!

नवरीनी मायः हां वं बाई! माले म्हाईत शे ना! ह्ये का पह्यलं लगन शे आपल्या घरमां...

एक करवली (मुसमुसत): वं माय मी आते काय करु? मन्ही नथ नई सापडी राह्यनी! कालदिन देव आणाले गयथु तव्हय तं व्हती नाकमां …
दुसरी करवली: बैगं! तुन्ह्या लुगड्यामां तं नै अडकनि? कालदिन तु ते जरीनं लुगडं घालेल व्हतं ना! त्यामां धुंडी ले तं पह्यले.नवरीनी मावशी: आह्या माय वं! तुन्हा नाकमां तं दखी व्हती मी, तु बेळमाथनी पुजी राह्यन्थी तव्हय. कोन मरी जाय जो ना हात मां पडी व्हई ना तं कल्याण शे!

पहिली करवली: हाव ना व माय ! आते दिप्वॉळीले लिन्थी! यास्ले कळनं तं मन्ही काई खैर नई.


नवरीनी मायः हा वं बहीन्! जवाईले कळनं तं मग बसं व्हई गयं! आसा दांगडो घाली तो लगिनमां. आन दख तु...आथाईनच वापस जाई इले लिसन! आखो तिले आयुसभर डोस दीथीन तिन्हा सासरकडना लोके ... "भाउना लगिनमां गयी आन नथना आहेर करी उनी चोरास्ले.!!! " तुले सांगस.. हाई शुभीना नवरा भलता आग्यायेताळ शे! एक येळ इस्तव हातमां धरी जाई पन ह्यास्ना सोभाव ना ... बाप रे बाप! शुभे, तु आतेपुरती मन्ही नथ घाली ले बईन! पन त्यास्ले आतेच नको सांगु!


इतक्यात सासुरवाशीण कस्तुरा गावावरुन येउन पोचते. आल्याआल्याच आईच्या गळ्यात पडते.

"माय वं, अण्णाले पह्यलेच सांगं व्हतं मी की मन्ह्या नंदासकडं (नणंदा) बी निवतं धाडनं पडी, पन त्यास्ले पत्रिका नै मियनी आतेपावत. तं मन्ही सासु कितली बोलनी माले, म्हाईत शे का? की इन्हा मायबापले काही वळनच नै शे तं पोरले कसं व्हई?, आनि इन्हा बाप तर नाक वर करीसन बोलस.. आसं आनि तसं...!" तु आते ना आते शरदले (चुलतभावाला) गाडी लीसन धाड आणि मन्ही नणंदले ली ये म्हना! माले काई म्हाईत नै...
नवरीनी मायः का वं कस्तुरा? माले एक सांग, तुन्ही नणंदना देरना (दिराच्या) लगनमां आम्हले निवतं धाडं व्हतं का?आन मंग आते कसा बोलतस तुन्हा सासरकडना? हाई दख! आते तुले खमकी व्हयनं पडी. ४ साल व्हई ग्यात लगनले...

नवरीना बापः आटपा आटपा... तठे नवरदेव ई लागना पारवर आनि तुम्ही काय चावळी राह्यनात आठे? हाऊ बबन्या कोठे शिलगना? वर्हाडना स्वागत कराले फुलमाळा सांगन्या व्हत्या मी कोपर्यावरन्या फुलवालाले! लेवाले ग्यात का कोन? तो सत्या, आज्या तर काई कामनाच नै शे!

त्या वाजावाला, पोटझोड्या उनात का? त्याले म्हना नेमबंद वाजवा, नवरदेवकडना वर्‍हाड पोची राह्यनं ! कव्हय जाई हाई 'सुख्या' आते पारवर? त्यान्हाबरोबर कोन जाई राह्यनं? शेवंता, धुरपदा,कली तुम्हन्या पोरेस्ले धाडा बरं सुख्याना बरोबर!

बबन्या: हाई काय ई राह्यनु हार लीसन! घ्या वं बहिनीओन... गजरा बांधा!

नवरीना काका(नवरीना बापले): दादा, मानकर्‍यास्नी लिश्ट व्हई ना? हाई नारय आनेल शेतस..,. नेमबंद मोजी ल्या बरं! पंगतीमां त्यास्ना ताटेसले लावाना शेतस!

नवरीनी आजली (आज्जी) : तेलनपापड्या लिध्यात का? आन सांजोर्‍या? त्या परमिलाले इचार बरं! गिरजे... नवरदेवले पारवर देवाले दुधशेवाया ली ले तं ताटमां!
नवरीची आई: हाओ आत्याबाई( सासुबाईला आत्या म्हणतात)! लिधं बरं मी बठ्ठं सामान!
नवरीना काका: चला चला..गाडीमां बठी ल्या!