थोडं इतिहासात डोकावुया:
असं म्हणतात की विंध्याचल पर्वत ओलांडुन दक्षिणेत गोदातीरी वास्तव्य करणारे 'अगस्त्य/अगस्ती' ऋषी हे पहिले आर्य. प्राचीन काळी खान्देशाचे नाव 'रसिक' होते.

त्या काळात सम्राट अशोकाच्या अंमलाखाली हा प्रदेश होता. त्यांच्यानंतर 'संगा' घराण्यातील 'पुष्यमित्र' याने मौर्यांना इथुन दूर करुन राज्य केले. त्याच्याही नंतर सातवाहन राजांनी हा प्रदेश काबिज केला.

इ.स. २५० मधे अभिर/ अहिर राजांनी आक्रमण करुन सातवाहनांना दुर केले आणि इथे अनेक वर्ष राज्य केले. इ.स. ३१६- ३६७ या काळात इथे महाराजा रुद्रदास, महाराजा स्वामीदास, महाराजा भुलुंडा ह्या अहिर राज्यांनी राज्य केले. हे अहिर राजे उत्तर हिंदुस्थानातुन इकडे आले. पशुपालन /शेती हा जरी त्यांचा व्यवसाय होता तरी ते लढवय्ये होते. त्यांची भाषा अहिरवाणी किंवा अहिराणी ही खान्देशातली भाषा आहे. खर तर खान्देश परगण्याला तीन जिल्ह्यांच्या परिसिमा लाभलेल्या आहेत. महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि गुजरात. तिन्ही राज्यांच्या भाषा मिळुन अशी अहिराणी भाषा बनलेली आहे.

काही काळ यादव कुळातील सेउनचंद्र राजाने इथे राज्य केले त्याच्या नावावरुन 'सेउनदेश' असे नाव पडले. नंतर गुजरातेतील फारुकी राजे अहमद१ या खानांच्या नावावरुन 'खान्देश' असे नाव झाले. सातवाहनांनंतर वाकाटक, राष्ट्रकुट, चालुक्य राजांकडुन हा प्रदेश १३व्या शतकापर्यंत देवगिरीच्या यादवांकडे आला. अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणानंतर १२९४ मधे हा प्रदेश त्याच्या ताब्यात गेला होता. १३७० पर्यंत खिलजीने राज्य केले. त्याच काळात थाळनेर आणि करवंदी सुभा सुलतान फिरोज तुघलक याच्याकडुन मलिक राजा फारुकी ला दान देण्यात आला. त्याच्या काळात देवपुर आणि जुने धुळे येथे गढी बांधण्यात आली. दुर्दैवाने १८७२ च्या पांझरेच्या पुरात देवपुरातली गढी वाहुन गेली. धुळ्याजवळच्या लळिंग किल्ल्यावरुन सुलतान फारुकीने इ.स. १६०० पर्यंत धुळ्यावर अंमल गाजवला. इ.स. १६२९ मधे हा प्रदेश मुघलांच्या साम्राज्यात गेला. इ.स. १८०३ मधे पडलेल्या भयंकर दुष्काळामुळे अनेक लोक गाव सोडुन निघुन जाउ लागले तेव्हा, विठ्ठल नरसिंग विंचुरकरांचा सहकारी बाळाजी बळवंत याच्या प्रयत्नाने पुन्हा हे गाव वसले.
१८१८ मधे हा परगणा इंग्रजांच्या ताब्यात गेला. ब्रिटिशांचा सनदी अधिकारी कॅप्टन ब्रिग याने हा विभाग चालवायला घेतला. असं म्हणतात की धुळे शहराची विशिष्ट रचना कॅप्टन ब्रिग यांच्या प्रयत्नातुन साकारली आहे. शहरातुन जाणारा एकच मुख्य रस्ता आणि त्याला काटकोनात जोडणा-या गल्ल्या/ रस्ते ही ती विशेष रचना.

१५ ऑगस्ट १९०० मधे धुळे- चाळीसगाव रेल्वे सुरु झाली. स्वातंत्र्योत्तर काळात १९६० मधे धुळे जिल्हा महाराष्ट्र राज्याला अधिकृतरित्या जोडला गेला.

१ जुलै १९९८ साली धुळे जिल्हा विभागुन 'धुळे' व 'नंदुरबार' असे दोन जिल्हे तयार करण्यात आले.

Friday, 28 February 2014

अहिराणी कविता



मंडळी,

काल मायबोली.कॉम या वेबसाईटवर 'मराठी भाषा दिन' साजरा झाला. त्यात एक 'बोलीभाषेतील काव्यधारा' असा उपक्रम होता.
त्यानिमित्त लिहिलेलं हे काही.

थोडं गंभीर खरडलेलं आहे. काल आमच्या अंगणात बाबांनी लावलेली १०-१२ वर्षं जुनी असलेली काही झाडं (घराच्या पायामधे त्यांची मुळं गेल्याने) नाईलाजाने तोडावी लागली. झाडांवर घातलेला प्रत्येक घाव काळजावर होत होता.बाबांचं या प्रत्येक झाडाविषयी असलेलं नातं, आठवणी जाग्या झाल्या आणी डोळ्यात पाणी आलं. मग त्याच अवस्थेत, तोडक्या मोडक्या अहिराणीमधे काही ओळी खरडल्या. गोड मानुन घ्याव्या.

(घरात फक्त आज्जीच अहिराणी बोलायची. तिला जाऊन आता २०वर्ष झाली. आई-बाबांची भाषा मराठीच. अहिराणी भाषेत स्वतःचं असं काही लिहायचं, हा पहिलाच प्रयत्न. म्हणुन आधी बहिणाबाईकडे अहिराणीमधे लिहायची बुद्धी मागतेय.)

आजली बोले अहिराणी
माय मन्ही मराठी
अहिराणीमां लिखाले
बुद्धी दे वं बहिणाबाई

मतलबी रे मानसा
कसा व्हयना निर्दयी
कुर्‍हाड चाले झाडावर
घाव लेकीच्या हृदयी

(सोनचाफा)
तुन्हं फुल पहिलं वहिलं
बाबांच्या अस्थिवर वाहिलं
आज तुले छाटतांना
मन का रे नाही द्रवलं?

('केशर' आंबा)
हतबल मन्हा बाबा
बठे तुन्ह्या सावलीमां
होता वैभव निरखीत
मरणाच्या दारात उभा

(पेरु)
हाई आम्हना 'सरदार' पेरु
लोका सांगे कवतिके
त्यान्हाच खाले 'शेवटनं'
बाबाले न्हाऊ घाले लोके

असा कसा रे देवा
न्याव(न्याय) तुन्ह्या घरचा
लेकरान्या घरट्याकरता
बळी 'जुन्या खोडाचा'


आते कसानी सावली?
कोठेना 'खंड्या' नि 'कोकिळा'?
मन्या आंगणमां उना
बठ्ठा रखरखीत उन्हाळा

Thursday, 22 August 2013

हाई ल्या आखो कानबाईनी गानी!


हाई ल्या आखो कानबाईनी गानी!
१५ दिवसांपुर्वी भावाकडे कानबाई झाली.
नविन काही गाणी मिळालीत जुन्या बायकांकडुन. :)

१) घरधनीनी मंडप सवारा, कथाईन जाशी मन्ही कानबाई माय
गावना मारुतीनी शिवार रोखी, कथाईन जाशी मन्ही कानबाई माय
गावना मारुतीले शेंदुर नारय, कथाईन जाशी...
गावना पाटीलने दरजा (दरवाजा) रोखा, कथाईन...
गावना पाटीलले पान सुपारी, कथाईन जाशी...
घरधनीनी मंडप संवारा, कथाईन जाशी...
घरधनीना जयजयकार, तठेच राहसु वं माय!

२) हाऊ काय सरावन महीना वं माय
पान वार्‍यानं उडेल वं माय
आईच्या दरबारी पडेल वं माय
आईने शेल्याने झाकीले वं माय
आईचा सासरा दशरथ वं माय, सासरा दशरथ
आईनी सासु केगामती (कैकयी) वं माय
आईना राम भरतार वं माय, राम भरतार


३) सुर्या निंघना, कानडी (कानबाई) उभ्या, दारावरी
तापी गोमीना(गोमती नदी) मेळ देव चांग्यावरी
सुर्या निंघना...
डोकी तांबन्या घागरी भेट गंगेवरी

४) कानबाई सांगे रानबाईने
थारा कोठे लेशी वं माय
थारा लेसु वारा लेसु
... भाईना घर वं माय
... भाईनं सुर्यामुखी दार
याने बसनं ठाकं दारी वं माय
ठाकं दारी याने मंडप दिला भारी वं माय

५) सहा महिन्याची रात्र गेली, गेले होते कुठे गं
वाणियाच्या दुकानी मी बसलो होतो तिथे गं
नारळाच्या गोणी मी तो खरेदी केल्या दोन्ही गं
सहा महिन्याची रात्र...
वाणियाच्या दुकानी मी...
खारकाच्या गोणी मी तं खरेदी केल्या दोन्ही गं
सहा महिन्याची रात्र गेली...
वाणीयाच्या दुकानी मी.....
लिंबोळ्याच्या गोणी मी तं खरेदी केल्या दोन्ही गं



Wednesday, 24 April 2013

आखाजी- सासुरवाशीणींचा सण!

पुढच्या महिन्यात आखाजी आहे मंडळी!भले तो लौकीकअर्थाने पितरांचा सण का म्हणेनात. पण खान्देशात तो सासुरवाशिणींचा सण आहे. सासरी गेलेल्या लेकींना वर्षातुन दोनदाच माहेरी जायला मिळतं. दिवाळी आणि आखाजी. दिवाळी घाई गडबडीत देणं घेणं करण्यात जाते. आखाजी म्हण्जे विसाव्याचा सण. सासरच्या घबडग्यातुन, कामाच्या रट्ट्यातुन तेवढाच आराम. त्यामुळे त्या या सणाची आतुरतेने वाट बघत असतात.  सासुरवाशिणीना गौराई असं म्हटलं जातं. आणि जावयाला शंकरजी!

काल इंटरनेटवर सर्फ करता करता ही आखाजीची गाणी मिळाली.

माहेरच्या ओढीने चैत्र वैशाखाच्या उन्हात, भावाबरोबर माहेरी निघालेली 'ती'. उन्हाने खडक तापुन लाल झालेत. त्यावरुन पळत निघतांना बेगडी वहाणेचा उपयोग होत नाही. त्यामुळे पायही लाल झालेत. कण्हेरीच्या झाडाची सावली ती किती. तेवढ्याही सावलीचा आधार घेउन, विसावा घेउन नव्या दमाने पुन्हा 'ती' माहेरच्या वाटेला लागते.

चैत्र वैशाखाचं उन्हं वं माय
वैशाखाचं उन्हं
खडक तापुन लाल झाले वं माय
तापुन झाले लाल
आईच्या पायी आले फोड वं माय
पायी आले फोड
आईची बेगडी वाव्हन वं माय
बेगडी वाव्हन
तठे काय कन्हेरानं झाड वं माय
कन्हेरानं झाड


माहेरी या सासुरवाशिणीचं कित्ती कोडकौतुक. आमरस,पुरणपोळीचं गोड जेवण, पुडाच्या पाटोड्या आणि काय काय...!  दुपारच्या जेवणानंतर शेजारपाजारच्या सख्या भेटायला येतात. आंब्याच्या झाडाखाली पथार्‍या टाकल्या जातात..गप्पागोष्टी, चेष्टामस्करी सुरु होते. मग आंब्याच्या झाडांना झोके बांधले जातात.  झोके घेत मुली गाण्यातुन आपल्याला सासरी कसं सुख आहे, नवरा किती काळजी घेतो हे असं रुपकातुन सांगतात.

वाटवर हिरकनी खंदी वं माय
संकर राजानी खंदी वं माय
वाटवर जाई कोनी लाई वं माय
संकर राजानी लाई वं माय
जाईले पानी कोनी घालं वं माय
संकर राजानी घालं वं माय
जाईले फुल कोनी आनं वं माय
संकर रानाजी आनं वं माय
गौराईना गयामां माय कोनी घाली वं माय
संकर राजानी घाली वं माय


इथे एखादी हळुच एखादी सखीच्या कानात कुजबुजते आणि सासरची व्यथा मांडते.

गौराई नारय तोडी लयनी
वं माय तोडी लयनी
इकाले गयी तं देड पैसा
वं माय देड पैसा
सासुनी सांग्या मीठ मिरच्या
वं माय मीठ मिरच्या
सासरानी सांगी तंबाखु
वं माय तंबाखु
देरनी सांगा झिंगी भवरा
वं माय झिंगी भवरा
ननिन्दनी सांगा ऐन दोरा
वं माय ऐन दोरा
पतीनी सांगा पान पुडा
वं माय पान पुडा
या संसारले हात जोडा
वं माय हात जोडा


आखाजीचे दिवस निघुन जातात. आता सासरी परतायची वेळ येते. गौराईचा नवरा तिला घ्यायला सासुरवाडीला  येतो. आता त्याला इथे 'राम' संबोधतात. सासुरवाडीचा पाहुणचार घेउन गौराई सासरी निघते.  नवर्‍याच्या रथाबद्दल सांगतांना कौतुकाने म्हणते.

गडगड रथ चाले रामाचा
नि बहुत लावण्ण्याचा
सोला साखल्या रथाला
नि बावन्न खिडक्या त्याला
बायनी लावली खारीक
बापसे बारीक
बायनी लावली सुपारी
बापसे बेपारी


गौराईला सासरी धाडण्याकरता एकच लगबग सुरु होते. पण आपली गौराई कसली शुर! ती स्वत:च शिंप्याकडुन साड्या आणते, सोनाराकडुन हार विकत घेते, वाण्याकडे जाउन नारळ घेउन येते.

काया घोडानी काय मन्ही गौराई
इन्हा प्रताप चालस ठाई ठाई
प्रताप कोन्या वाडी गेला
प्रताप शिंपी वाडी गेला
शिंपी उठला घाई घाई
साड्या काढल्या नवलाई
सोनार उठला घाई घाई
नवसर हार लयी येई
वाणी उठला घाई घाई
नारय लयी पयी पयी


सासरी जातांना निरोप घेतांना गौराईच्या आणि तिच्या आईच्या डोळ्यात पाणी तरारतं. आता भेट दिवाळीनंतरच म्हणजे सहा महिन्यांनी. दाटुन आलेला कंठ आणि भरल्या आवाजात ती आईला म्हणते, "धाकट्या भावाला घ्यायला नको पाठवुस गं. घनदाट आंबराईत त्याचा जीव घाबरतो. म्हणुन मोठ्या भावाला मला घ्यायला पाठव."

आखाजी दिवायी सहा महिनानी लाम्हन
भाऊसे पाव्हन मझार दसरा जामिन
धाकला मुराई नको धाडजो
माय बाई आंबानी आमराई
राघो मैनाना जीव भ्याई


इंटरनेटवरुन साभार!!


Saturday, 30 March 2013

धुळानी धुळवड


लोकेसहो!
आतेच धुळवड खेळी ना! आम्हन्या धुयामां बी होळी ना येगळाच रंग चढस.
मन्हा बाबा सांगे..त्यान्हा टाईमले धुळवडना मोठा दांगडो व्हये. आते आम्ही ६वी गल्ली ना लोके तुम्हले माहीती नैत. धुळामां हरेक गल्ली म्हन्जे विशेष शे. ६वी गल्ली म्हण्जे दादा लोकेस्नी गल्ली समजतस. ५वी गल्ली बाम्हन लोकेस्नी. तीन्हा बाजुले खोलगल्ली- गल्ली नंबर ४. बारीशमां आख्खा गावनं पाणी खोलगल्ली मां भरे. खोलगल्लीना जोडे आग्रा रोड... कपडास्ना आणि सराफ बाजार. आग्रा रोडना एक साईडले पाच कंदील.
पुर्वी माघ पौर्णिमा ले म्हन्जे होळीना पह्यले नी पौर्णिमालेच रस्तामां खड्डा खणीसन एरंडनं झाड गाडी देत. मग बठ्ठा लोकेस्नी समझी लेवानं की होळी महिनाभर शे आते. स्मित होळीना पह्यले आठ दिन पोरेसोरेस्नी लगबग सुरु व्हये....वर्गनी आणि लाकडं मांगानं करता. जर गल्लीमां कुणी लाकडं नै दिधी तं बस्स...त्याले असा तर्रास देये पोरे!! एक साल, एक डॉक्टरने वर्गणी मांगाना करता ज्या पोरे जाएल व्हते त्यास्ले हाकलुन दिन्थं. बस्स्...पोरे चिडी ग्यात. रातमां, त्यान्हा डॉक्टरनां बोर्ड काढुन त्या टुकार पोरेस्नी न्हाईना घरना बाहेर टांगी दिधा. आणि न्हाईना बोर्ड... हाई डॉक्टरना घरना भायेर. सकायी उठीसन ही बोम्ब व्हयनी व्हती. हाहा
हां तर धुळवडनी बात करी राह्यनु. तव्हय गल्लीना कोपरा कोपरामां मोठा मोठा कलरनं पाणीना ड्रम बैलगाडीमां भरी लईयेत. आणि तठा ठी देत. अन मग रोडवरुन जानारा एक भी माणुस सुटे नै. त्या काय आसं इचकुपिचकु पिचकारी लिसन नै खेयेत. इतली मोठी डोलची मां पाणी लिसन माणसास्ले पाठवर सपका मारे तं तुमन्हा शर्ट काय करतस्...बनियन बी फाटी जाए लोकेस्ना!!! कोनी मजाकना व्हई तं त्याले उचलीसन ड्रममां बुचकाळी देत.

 आते तं काय लोकेस्ले पेवाले पानी नै शे नि काय लोके होळी खेळतीन! तर आशी व्हये आम्हन्या गावनी होळी.
आखो लिखानं शे... येळ मिळी तसं लिखसु. :)

Monday, 15 October 2012

    धुळ्याचे आग्रारोडवरील राममंदीरः
 धुळ्यातील हे अतिशय जुने मंदीर. याची उभारणी १९०८ मधे झाली असे तिथले पुजारी सांगतात. गणपतीमधे धुळ्याला गेले तेव्हा आवर्जुन या मंदीराला भेट दिली. अगदी खरं सांगायचं म्हणजे माझ्या बाबांच्या खाणाखुणा जपण्यासाठी भेट दिली मंदीराला. या मंदीराबाबत बाबा आठवण सांगतात ती अशी.
 बाबा बी.ए. फायनल इयरला असावेत तेव्हा. बाबांना कुणीतरी मित्राने असच एक जुनं बुलबुल वाद्य आणुन दिलं. ते घरात आल्यापासुन बाबांचा अभ्यासावरचं लक्ष उडालच. मुळात हुशार असणारे आमचे बाबा, घरच्या परिस्थितीमुळे पिंगळे नावाच्या सद्गृहस्थांकडे पाणी भरायचे. चार मजले असलेल्या इमारतीत सर्वात खालच्या मजल्यावरुन हातात दोन लोखंडी पाण्याच्या बादल्या भरुन चवथ्या मजल्यावर असलेल्या या साहेबांकडे त्यांचा ड्रम  आणि इतर प्यायच्या पाण्याचे हंडे वगैरे भरुन देणं सोप्पं काम नव्हतं. पण पिंगळे साहेबांनी बाबांची शाळेची फी महिना ५ रु. भरायचं कबुल केल्यामुळे ते हे काम करत. तर बुलबुलमुळे अभ्यासावरचं लक्ष उडालं. परिणामी बाबा पहिल्यांदा नापास झाले.
नंतर चुक कळल्यावर बाबांनी झटुन अभ्यास करायचं ठरवलं. त्यासाठी कधी रस्त्यावरच्या दिव्याखाली  तर कधी या मंदीरात असलेल्या दोन वैशिष्ट्यपुर्ण मोठाल्या समयांच्या उजेडात अभ्यास केला. आणि रिजल्ट आला. बाबा, सहा जिल्ह्यांमधे पहिले आले होते. :)
इतकी वर्ष खुद्द धुळ्यात रहात असतांना कधी या मंदीरात जाण्याचा योग आला नाही. पण आता बाबा गेल्यावर हे पाहण्याची इच्छा तीव्र झाली. म्हणुन यावेळेस या मंदीराला अगदी आवर्जुन भेट दिली. आतमधे एक वृद्ध बाबा बसले होते(बहुतेक पुजारी असावेत). त्यांना विचारल्यावर त्यांनी सांगितलं 'त्या' समया साखळदंडांनी बांधल्या होत्या. तरी चोरीस गेल्या. मंदीरातील गाभार्याचं काम वैशिष्ट्यपुर्ण आणि अतिशय कलाकुसरीचं आहे. खालील वेबलिंकवर ते दिसेल.
http://commons.wikimedia.org/wiki/File:Sculptor_work_at_Shriram_temple_in_Dhule_city_-_2.JPG
http://commons.wikimedia.org/wiki/File:Sculptor_work_at_Shriram_temple_in_Dhule_city_-_1.JPG
http://commons.wikimedia.org/wiki/File:Sculptor_work_at_Shriram_temple_in_Dhule_city_-_4.JPG
http://commons.wikimedia.org/wiki/File:Sculptor_work_at_Shriram_temple_in_Dhule_city_-_5.JPG
http://commons.wikimedia.org/wiki/File:Sculptor_work_at_Shriram_temple_in_Dhule_city_-_7.JPG

Tuesday, 8 May 2012

कैरीचे लोणचे (खान्देशी पद्धतीचे)

मंडळी, लोणच्याचा सिझन सुरु झाला आहे. खान्देशी पद्धतीच्या लोणच्याची चव चाखायचीय?
चला तर मग...
परवाच आईला सोबत घेउन लोणचे केले. आईच्या हातचे लोणचे आमच्या आख्ख्या फॅमिलीत प्रसिद्ध आहे. इथे पुण्यातही कॉलनीत, ओळखीच्यांकडे असे कुठुन कुठुन तिला बोलावणे असते लोणचं टाकण्यासाठी. एकदा तर बहिणीने नाशिकहुन फोन करुन ऑनलाईन लोणचे घातले होते. त्याची चवही अप्रतिम आली होती. स्मित
सगळी कृती आईचीच...मी फक्त हेल्पर.
एकाच गोष्टीबद्दल माफ करा लोक्स. लोणचं (ऑफीसातुन संध्याकाळी घरी गेल्यावर) रात्री टाकल्याने फोटो म्हणावे तितके चांगले आलेले नाहीत.

साहित्यः
कैर्‍या: १० किलो
मीठः दीड किलो
गोडेतेलः २किलो
ब्याडगी मिरची तिखटः अर्धा किलो
ब्याडगी मिरची आख्खी: पाव किलो किंवा अंदाजे
मोहरी दाळः ३ पाव
बडीशेपः अदपाव ( एक मध्यम वाटी भरुन)
मेथी: १५० ग्रॅ.
धणे: १५० ग्रॅ.
लोणच्याचा मसाला:
मीरे, लवंगा, दालचिनी, सूंठ पावडर - सर्व एक एक चमचा(पोह्यांचा)
हिंगः २ चमचे
वेलदोडे: १ चमचा
जायफळ (किसुन) : १ चमचा
क्रमवार पाककृती:
सर्वप्रथम कैर्‍या दोन दिवस पाण्यात भिजत ठेवाव्यात. नंतर व्यवस्थित कोरड्या पुसुन सुड्याने(कैरी फोडण्याची विळी) फोडी करुन घ्याव्यात. आतला गर इ. काढुन टाकुन कैरीच्या फोडीसुद्धा पुसुन घ्याव्यात.














नंतर फोटोत दाखवल्याप्रमाणे आणि प्रमाण दिल्याप्रमाणे लोणच्याच्या मसाल्याचे सगळे जिन्नस कढईत टाकावे.



गोडेतेल गरम करुन (कडकडीत पण उकळते नको) ते यात हळुहळु टाकावे...म्हणजे लाल तिखट खरपुस भाजले जाते आणी छान लाल रंग येतो शिवाय चवीतही फरक पडतो. ब्याडगी आख्खी मिरची तव्यावर थोड्या तेलावर भाजुन घ्यावी आणि यात कालवावी.
सर्व जिन्नस एकत्र करुन थोडा वेळ मुरु द्यावे. नंतर कैर्‍यांवर पसरवत जावे.

एका बाजुला लोणच्याची बरणी (चिनीमातीचीच घेणे सोयिस्कर), व्यवस्थित पुसुन घ्यावी आणि मगच त्यात लोणचे भरावे.
फोडींच्या वर तेल येइल इतके तेल असावे.
लागणारा वेळ: 
२ तास

टिप: लोणचं टिकण्यासाठी मीठ आणि बुडतं तेल आवश्यक आहे.

माहितीचा स्त्रोतः मातोश्री
 
 
 
 
 
 
आणि आता २ महिन्यांनी संपुर्णपणे मुरल्यावर हे लोणचं असं दिसतय. :)
 

 
 

Thursday, 3 May 2012

डुबुकवड्यांची मसालेदार आमटी!















लागणारे जिन्नस: 

मसाल्यासाठी:
मिरे: ८-१०
लवंगा-५-६
दालचिनी- २-३
मसाला वेलदोडा_ ३
चक्रफुल- ४
लाल तिखट- २ मध्यम आकाराचे चमचे
गरम मसाला असल्यासः २ चमचे
सुके खोबरे: अर्धी वाटी
कांदे: मध्यम आकाराचे ३
लसुणः ८-१० पाकळ्या
आलं- बोटाच्या पेराएवढं
मीठः आवडेत तितकं
डुबुकवड्यांसाठी:
बेसनः एक मध्यम आकाराची वाटी भरुन
मीठः चवीपुरते
लाल तिखटः आवडत असल्यास १ छोटा चमचा
हळदः किंचित
ओवा: भजीच्या पीठात घालतो तशा
क्रमवार पाककृती: 
मसाल्याची आमटी:
कांदे चिरुन तव्यावर थोड्या तेलावर लालसर भाजुन घ्यावे किंवा तसाच कांदा गॅसवर भाजला तरी चालेल. सुकं खोबरं काप करुन तेही तव्यावर थोड्या तेलात लालसर भाजावे.
लवंग मिरे, दालचिनी, चक्रफुल, मसाला वेलदोडा सर्वच तव्यावर भाजुन घ्यावेत.
आणि आता हे सर्व लाल तिखट, घरचा तयार गरम मसाला असेल तर त्यासहीत मिक्सरमधुन बारीक करावेत.
कढईत तेल घेउन तेल तापले की छोटा चमचाभर बेसन तेलात टाकावे. आणि नंतर हा वाटलेला मसाला त्यात घालावा.मसाला तेलात चांगला परतुन घ्यावा. मसाल्याचा वास घरभर पसरला आणि मसाला उलथन्याला चिकटला नाही म्हण्जे मसाला चांगला परतला गेला असे समजावे. नंतर जरुरीपुरते पाणी घालावे. व ही आमटी एकीकडे उकळु द्यावी. आधी जोरात करुन एकदा उकळी फुटली की बारीक गॅसवर. म्हण्जे आमटीला तेल चांगले सुटते.

आता डुबुकवड्यांसाठी:
वाटीभर बेसन पाणी टाकुन आणि वरील जिन्नस टाकुन म्हणजे ओवा, मीठ, हवं असल्यास लाल तिखट, हळद, भजीच्या पीठासारखं किंवा त्याहीपेक्षा थोडसं घट्ट एकजीव कालवावं.
आणि ही आमटी चांगली उकळली की त्यात भजीसारखे थोडे थोडे सोडावे. नंतर आमटीत या डुबुकवड्यांना खाली वर करुन शिजु द्यावे. चमच्यात घेउन शिजले की नाही हे बघता येईल.
वरुन कोंथिंबीर बारीक चिरुन घालावी व पुन्हा एक उकळी घ्यावी. गॅस बंद करावा.
भात, चपातीबरोबर ही खाता येते.


टीपः डुबुकवड्यांची आमटी थंड झाली की घट्ट होत जाते. म्हणुन पाणी आधी थोडेसे जास्त घालुन भरपुर उकळु द्यावे